औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यास काँग्रेसचा कायम विरोध असेल- बाळासाहेब थोरात


स्थैर्य, मुंबई, दि.१: शिवसेनेचे अनेक दिवसांपासूनचे स्वप्न आता पूर्ण होण्याची शक्यता आहे. औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडे तसा प्रस्ताव पाठवला आहे. पण, महाविकास सरकारमधील घटक असलेल्या कॉंग्रेसने या नामांतरणाला विरोध केला आहे. काँग्रेसचा या नामांतरणाला विरोध असल्याचे काँग्रेस नेते आणि राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

माध्यमांशी संवाद साधताना थोरात म्हणाले की, ‘औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याला आमचा विरोध आहे. महाविकास आघाडी विकासाच्या मुद्द्यावर स्थापन करण्यात आली आहे. सरकारने सामान्य माणसाचे जीवन सुखकर करण्याच्या दिशेने वाटचाल करायला हवी. हाच कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या मुख्य हेतू आहे. महाविकास आघाडीच्या कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये अशाप्रकारे शहरांचे नाव बदलण्याचे ठरलेले नाही,’अशी प्रतिक्रिया थोरात यांनी दिली.

थोरात पुढे म्हणाले की, ‘नाव बदलण्याचा अजेंडा आम्हाला मान्य नाही. नाव बदलण्यार आमचा विश्वास नाही. शहराचे नाव बदलून काही होणार नाही. काही गोष्टींचा इतिहास बदलू शकत नाही. आम्ही विकासाची वाटचाल सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून आणि राज्य घटनेच्या मूलभूत तत्त्वांना धरुन करतो. शहराचे नाव बदलण्याच्या या प्रस्तावाला आमचा विरोध राहणार,’असेही थोरात म्हणाले.


Back to top button
Don`t copy text!