वाधवान बंधू पास प्रकरणाची सीबीआय चौकशी करा : देवेंद्र फडणवीस


स्थैर्य, मुंबई, दि. 18 : वादग्रस्त वाधवान बंधू व कुटुंबियांना लॉकडाऊनच्या काळात खंडाळा ते महाबळेश्‍वर असा प्रवास करण्यासाठी विशेष पास दिल्याने वादात सापडलेले प्रधान सचिव अमिताभ गुप्ता हे पुन्हा सेवेत रूजू झाले आहेत. त्यांच्याकडे आता स्थलांतरित कामगार, विद्यार्थी, यात्रेकरू यांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्यासाठी नेमलेल्या समितीचे प्रमुखपदही देण्यात आले आहे. यामुळे सरकारवर टीका करताना, या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

राज्यात तसेच देशभर लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर आंतरजिल्हा प्रवासास बंदी घालण्यात आली. मात्र वाधवान कुटुंबियांनी खंडाळा ते महाबळेश्‍वर असा प्रवास केला होता. प्रवास करताना त्यांनी अमिताभ गुप्ता यांच्या सहीचे पत्र पोलिसांना दाखवले होते. ही बाब उघड झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली.10 एप्रिल रोजी अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. मात्र चौकशी समितीने गुप्ता यांना समज देऊन प्रकरणावर पडदा टाकला आहे. आता महिन्याभरानंतर अमिताभ गुप्ता पुन्हा कामावर रूजू झाले आहेत. त्यांना अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी यांना त्यांच्या मूळगावी पाठविण्याबाबत नेमण्यात आलेल्या समितीचे प्रमुखपदही देण्यात आले आहे. यावर भाजपने जोरदार टीका केली.

लॉकडाऊनच्या काळात ईडीचा आरोप असलेल्या वाधवान बंधूंना पास देणारे सरकारी अधिकारी अमिताभ गुप्ता पुन्हा रूजू झाले आहेत. कोणताही सरकारी अधिकारी आपल्या भरोशावर असा पास देऊ शकत नाही. जोपर्यंत सरकारमधील किंवा सरकार चालविणार्‍या प्रमुख लोकांचा आशिर्वाद, आदेश देत नाहीत तोपर्यंत असा पास दिला जात नाही. हे महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आहे की वाधवान सरकार आहे, असा प्रश्‍न विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करा, अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!