
दैनिक स्थैर्य | दि. १९ जून २०२४ | मुक्ताईनगर |
श्री संत मुक्ताबाई संस्थान, श्री क्षेत्र कोथळी – मुक्ताईनगर यांच्या वतीने दिला जाणारा ‘भागवत धर्म प्रसारक’ पुरस्कार ’सकाळ’चे खडकवासलाचे बातमीदार राजेंद्रकृष्ण कापसे यांना जाहीर झाला आहे. श्री क्षेत्र कोथळी – मुक्ताईनगर येथे या पुरस्काराची घोषणा श्री संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष अॅड. रवींद्र भैय्यासाहेब पाटील यांनी मुक्ताईनगर येथे केली.
यावेळी सोहळाप्रमुख रवींद्र महाराज हरणे, संदीप पाटील, भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे, विनायक हरणे आणि विश्वस्त उपस्थित होते.
अॅड. पाटील म्हणाले, श्री संत मुक्ताबाई संस्थानचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय भाऊसाहेब उर्फ प्रल्हादराव पाटील यांच्या स्मरणार्थ भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करणार्या वारकरी सांप्रदायातील एका पत्रकाराला २०१९ पासून ‘भागवत धर्म प्रसारक’ पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते. २०१९ ला पहिला पुरस्कार महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांना देण्यात आला. त्यानंतर दैनिक सकाळ पुण्याचे वरिष्ठ उपसंपादक शंकर टेमघरे, पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मनोज मांढरे (सासवड) यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
हा पुरस्कार आषाढी एकादशीच्या दिवशी बुधवार, दि. १७ जुलै २०२४ रोजी सकाळी ११ वाजता श्री संत मुक्ताबाई संस्थान मठ, श्री क्षेत्र पंढरपूर येथे मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे.
श्री. कापसे यांनी बारा वर्षे आषाढी वारीचे वार्तांकन केले आहे. दैनिक ‘लोकसत्ता’मध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे तसेच दैनिक ‘सकाळ’मध्ये संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वार्तांकन त्यांनी केले आहे. भागवत धर्माच्या प्रचार व प्रसारासाठी काढल्या जाणार्या श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान (पंजाब) या सायकल यात्रेच्या नियोजनात त्यांचा सहभाग राहिला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन संस्थानने या पुरस्कारासाठी कापसे यांची निवड केली आहे.