

पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात मध्यरात्री स्कॉर्पिओ गाडी दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात ८ युवकांचा मृत्यू झाला आहे. या अत्यंत दुर्दैवी घटनेवर साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून, सातारा आणि रायगड प्रशासनाला मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने मदत पुरवण्याचे निर्देश दिले आहेत.
स्थैर्य, सातारा, दि. २५ : रायगड जिल्ह्यातील पोलादपूर-महाबळेश्वर रस्त्यावरील आंबेनळी घाटात काल मध्यरात्री झालेल्या स्कॉर्पिओ गाडीच्या (क्रमांक MH 11 DN 2340) अपघाताने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने ही गाडी खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात आठ युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे.
पालकमंत्र्यांचे निर्देश व कार्यवाही:
-
घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांशी तात्काळ संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला.
-
बचावकार्य जलद गतीने राबवून पीडित कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याबाबत आणि पुढील प्रशासकीय सोपस्कार वेळेत पूर्ण करण्याबाबत त्यांनी प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
-
दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक सध्या पालकमंत्र्यांच्या सतत संपर्कात असून, संपूर्ण कार्यवाहीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
अथक बचावकार्य:
अपघाताची माहिती मिळताच रायगड व सातारा जिल्ह्यातील पोलीस प्रशासन, महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड रेस्क्यू टीम, महाड आणि पोलादपूर येथील ट्रेकर्स संस्थांसह स्थानिक नागरिकांनी मध्यरात्रीच्या अंधारातच खोल दरीत उतरून शोध व बचावकार्य सुरू केले. सर्वांच्या अथक प्रयत्नांनंतर अपघातग्रस्तांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे.
-
“मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या या दुःखात आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत,” अशा सांत्वनपर भावना पालकमंत्री श्री. देसाई यांनी व्यक्त केल्या आहेत.
