स्थैर्य, फलटण दि.११ : जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल, पोलीस उपअधीक्षक तानाजी बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यतत्पर राहणार असून गुन्हेगारांवर पोलीस यंत्रणेचा वचक ठेवून गुन्ह्यांची संख्या कमी कशी करता येईल यासाठी आपले विशेष प्राधान्य राहील. फलटण शहराला व शहराच्या परंपरेला साजेसे काम करण्याचा आपण निश्चितपणे प्रयत्न करु, अशी ग्वाही फलटण शहर पोलिस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक भारत किंद्रे दिली.
फलटण शहर पोलीस स्टेशनचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत पोलीस निरीक्षक भारत किंद्रे बोलत होते.
येत्या काळात फलटण शहरासह परिसरातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी करुन गुन्हेगारांवर पोलीस यंत्रणेचा वचक आणखी वाढवला जाईल असे सांगून नागरिकांमध्ये सुरक्षितेतची भावना निर्माण कशी होईल, यासाठी विशेष प्रयत्न केले जातील असेही फलटणचे नूतन पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी यावेळी स्पष्ट केले.