देशात पेट्रोल-डिझेल बंद होणार?; जल, वायू अन् ध्वनी प्रदूषणावर नितीन गडकरींचं भाष्य


दैनिक स्थैर्य । दि. ३१ मार्च २०२३ । नागपूर । पर्यावरणासाठी मी पेट्रोल-डिझेल बंद करण्यासाठी ताकदीने लढत आहे. इलेक्ट्रिक कार, स्कूटर, रिक्षा, ई-बस आल्यात, माझ्याकडे दिल्लीत हायड्रोजनवर चालणारी कार आहे. पाण्यातून निघणाऱ्या हायड्रोजनने कार चालते. मर्सिडिजपेक्षाही चांगली धावते. माणसाचे आरोग्य बिघडवण्याचे मुख्य कारण वायू, जल आणि ध्वनी प्रदूषण आहे असं रोखठोक भाष्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. नागपूरातील एका खासगी कार्यक्रमात गडकरी बोलत होते.

मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, लोकं हॉर्न वाजवतात. सायरन वाजवतात. या देशात नेत्यांचे लाल दिवे मीच बंद केले. फक्त पोलीस, रुग्णवाहिकांना सायरन वाजवण्याचे अधिकार आहेत. आता मी एक कायदा बनवत आहे. ज्यामुळे ते सायरनही बासरीसारखे वाजेल. जल, वायू आणि ध्वनी प्रदूषण रोखायला हवे. आता नाग नदीसाठी २४०० कोटी मंजूर झाले आहेत. आपण आपल्या शहराला जल, वायू आणि ध्वनी प्रदूषणापासून मुक्ती देऊ. हे लोकांच्या मदतीशिवाय होणार नाही असं त्यांनी सांगितले.

तसेच आपल्या देशात रस्ते सुरक्षेसाठी खूप कार्यक्रम होतात. अमिताभ बच्चन विना मोबदला काम करतात. रस्ते अपघातात मृत्यू होणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. दरवर्षी ५ लाख अपघात आणि दीड लाख मृत्यू होतात. मृतांमध्ये उच्चशिक्षित, डॉक्टर, युवकांची संख्या ६० टक्के आहे. रस्ते अपघात, पर्यावरण यासाठी आपली शिक्षण संस्था, सामाजिक संस्था यांनी पुढाकार घेऊन समाजाचं प्रशिक्षण आणि प्रबोधनही करायले हवे असं नितीन गडकरींनी म्हटलं.

दरम्यान, सगळ्यांनी मिळून या २ समस्यांवर मात करूया ज्यामुळे लोकांचे जीवन सुखमय होईल. त्यासाठी शिक्षण संस्थांनी पर्यावरण, रस्ते सुरक्षा यासाठी काम करावे. विशेषत: लहान मुलांना शिक्षण दिले पाहिजे. समाजानं पुढाकार घेतल्याशिवाय आपल्याला यश मिळणार नाही. नागपूरात हा कार्यक्रम मी आयोजित करत आहे. त्यासाठी नागरिकांनी पुढे यावे. पावसाळ्याआधी ३ मीटर उंचीचे वृक्ष सर्वांनी मिळून लावावे. हवा शुद्ध झाली तर सर्वांचे आरोग्य सुधारेल, डॉक्टरांकडे जाण्याची आवश्यकता भासणार नाही. प्रत्येक वार्डात यंदा पाऊस येण्यापूर्वी ३ मीटर उंचीचे ५०० वृक्ष लावावेत. जरीपटका येथील रिंग रोडवर सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत ग्रीनरी वाढवण्याचा प्रयत्न करावा. पाणी देणे, वृक्ष वाचवणे हे काम संस्थांनी करावे असं आवाहन नितीन गडकरींनी केले.


Back to top button
Don`t copy text!