लातूर जिल्हा प्रशासनाकडून आयोजित रोजगार मेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद


दैनिक स्थैर्य । दि. २९ ऑगस्ट २०२२ । लातूर । भारताचे येणारे दशक हे कौशल्याधारित सेवा उद्योगाचे असणार आहे. युवकांनी अधिकाधिक कौशल्य आत्मसात करुन कष्टाची तयारी ठेवावी. श्रमाला कोणताही शॉर्टकट नसतो, हे लक्षात घेवून नवनव्या वाटा निर्माण करा. लातूरचा डि. एन. ए. नव निर्मितीचा आहे. जिथे नोकरी कराल, तिथे लातूरचा लौकीक वाढवाल अशी अपेक्षा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केली.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय लातूर, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय, दयानंद वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र शिक्षण व प्रशिक्षणचे सहाय्यक आयुक्त बालाजी मरे, एस . बी वाघमारे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, जिल्हा अग्रणी बँकेचे महाव्यवस्थापक अनंत कसबे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक पी. डी. हनबर, प्राचार्य राजाराम पवार यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन करण्यात आली.

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. मार्गदर्शन करताना म्हणाले की, हा रोजागर मेळावा घेण्यासाठी प्रशासनाला सरासरी चार ते पाच महिन्यांचे नियोजन करावे लागले आहे. दोन वर्षापासून कोविडमुळे रोजगार मेळावा येथे घेता आला नव्हता. त्यामुळे लातूरसह पुणे, हैद्राबाद, औरंगाबाद या मोठ्या शहरातल्या कंपन्यांना बोलावून रोजगार मेळावा घेतला आहे. या मेळाव्याला एवढा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे या स्पर्धेतून गुणवत्तापूर्ण पर्याय कंपन्यांना मिळेल आणि यापुढे अधिकाधिक कंपन्या लातूरमध्ये येवून कौशल्य असलेल्या युवकांना निवडतील असे उत्तम काम आपल्या हातून व्हावे, अशी अपेक्षाही जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी यावेळी व्यक्त केली.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल मार्गदर्शन करतांना म्हणाले की, पुढचे दोन दशक हे भारताचेच दशक आहे. कारण की, भारतामध्ये युवकांची संख्या जास्त आहे, जर इतर पश्चिमी देशाचे तुलना केली, तर युरोप किंवा अमेरिकामध्ये आता जवळपास 60 ते 70 टक्के लोकसंख्या त्यांची वयस्कर झालेली आहे, म्हणजे वय 60 पेक्षा अधिक वयाची लोकसंख्या झालेली त्यासाठी कौशल्य विकसित करा रोजगार उपलब्ध होईल. तुम्ही पण नवंनवे उद्योग व्यवसाय टाकून रोजगार देणारे व्हा.

आपल्या देशामध्ये 70 टक्क्यापेक्षा जास्त लोकसंख्या ही युवक आहे. त्यामुळे अधिकाधिक युवकांनी रोजगार निर्माण करणारे व्यवसाय, उद्योग उभे करावेत. त्यातून आपल्या देशाचा मोठा विकास होऊ शकतो. रोजगार उपलब्ध करून यातून आपल्या देशाचा विकास होऊ शकतो. म्हणून म्हणतो की, पुढचे दोन दशक हे आपल्या भारताचे आहे.

पीएमईजीपी प्रधानमंत्री एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम आणि मुख्यमंत्री एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम या दोन योजना आहेत. त्याच्या माध्यमातून युवकांना ज्यांना उद्योग उभा करायचा असेल, त्यांना कर्जाच्या माध्यमातून आपल्याला लहान उद्योग उभा करता येवू शकतो. याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असेही आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी केले.

जिल्हा कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र शिक्षण व प्रशिक्षणचे सहाय्यक आयुक्त बालाजी मरे प्रास्ताविकात म्हणाले की, विद्यार्थ्यांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा. तसेच उपस्थित असलेल्या सर्व कंपन्यांना विनंती केली, या रोजगार मेळाव्यामध्ये ज्या युवक , युवतीची निवड होईल त्यांना जागेवरच कंपनीत निवडीबाबतचा आदेशही वितरीत करण्यात यावा. जेणे करुन त्यांना या मेळाव्या माध्यमातून प्रोत्साहनही मिळेल. त्यासोबत लातूर येथून निवड झालेल्या युवक, युवतींच्या निवास व भोजनाची व्यवस्थाही 15 दिवसांसाठी करण्याची विनंती केली.

दयानंद महाविद्यालयाचे प्रा. राजाराम मोरे म्हणाले की, शिक्षण आपल्या देशामध्ये नोकरी मागणारे कमी झाले पाहिजेत, आणि नोकरी देणारे जास्त झाले पाहिजेत, असे श्री. मोरे यांनी सांगितले.
सुत्रसंचालन यागेश शर्मा यांनी केले तर प्रास्ताविक बालाजी मरे यांनी केले. तर आभार एस. बी. वाघमारे यांनी मानले.

या कंपन्यांनी घेतला सहभाग

लातूर जिल्हयातील प्रमूख आस्थापना एलआयसी ऑफ इंडिया, अविनाश इंजीनीअरींग, (LIC of India, Avnish Engineering) किर्ती गोल्ड, एडीएम ॲग्रो इंडस्ट्री लातूर, प्रमोद सुपर मार्केट, विश्व सुपर बाजार, वैभव इंडस्ट्रीज लातूर, सनरिच ॲक्वा लातूर तसेच इतर काही लातूर शहरातील प्रमुख आस्थापना यांनी रिक्त पदे अधिसुचित होती.

तसेच पुणे, औरंगाबाद, हैदराबाद येथील नामांकीत आस्थापना फियाट इंडिया ॲटोमोबॉईल्स, प्रायव्हेट लिमीटेड रांजनगाव, पुणे (Fiat India Automobiles Pvt.Ltd.Ranjangaon Pune), याझाकी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड वाघोली, पुणे (Yazaki India Pvt.Ltd. Wagholi, Pune), एसएमपी ग्रुप, पुणे (SMP Group Pune), धुत ट्रान्समिशन औरंगाबाद ॲन्ड तोशीबा संगारेड्डी, हैद्राबाद (Dhoot Transmission Aurangabad & Toshiba Sangareddy Hyderabad) या नामांकीत कंपन्यांनी रिक्त पदे अधिसुचित केली आहेत.या साठी दहावी, बारावी, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, आय.टी.आय. (All Trade) / डिप्लोमा / बी.ई. इत्यादी शैक्षणिक पात्रतेसाठी आवश्यक मनुष्यबळाची आवश्यकता होती. लातूर जिल्हा प्रशासनाकडून दयानंद महाविद्यालयामध्ये आयोजित रोजगार मेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला 1 हजार 448 युवकांची प्राथमिक निवड या कंपन्याकडून करण्यात आली. यासाठी समुारे 3 हजार 350 युवकांनी सहभाग घेतला.


Back to top button
Don`t copy text!