सेंद्रीय पद्धतीने फुलवलेल्या विषमुक्त फळबागेतून उद्धव बाबर मिळवत आहेत लाखोंचे उत्पन्न


 

‘पर्यावरणप्रेमी’ म्हणून परिचित असणारे शेतकरी उद्धव बाबर यांनी माण तालुक्यातील देवापूर येथे पडीक माळरानावर संपूर्णत: सेंद्रीय पद्धतीने आपली शेती फुलविली आहे. त्याच्या शेतातील केशर आंबा फळ निर्यातीस आवश्यक असलले सर्व निकषांची पात्रता सिद्ध करीत असल्याने गेल्या दोन वर्षात श्री. बाबार यांनी आंबा परेदशात निर्यात केला आहे. यातून त्यांना भरघोस उत्पन्न मिळाले. याची दखल सातारा जिल्हा परिषदेने घेऊन कृषी विभागामार्फत देण्यात येणार्‍या डॉ. जे. के. बसू सेंद्रीय व आधुनिक शेती पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे. त्यांची ही यशकथा…

शेतकरी विविध पिकांसाठी शेतात रासायनिक खतांचा वारेमाफ वापर करीत असून रासायनिक खतांच्या व किटकनाशकामुळे जमिनीचा पोत खराब होतो व खर्चही अधिक आहे. याउलट जर शेतकर्‍यांनी सेंद्रीय खतांचा वापर केल्यास जमिनीचा पोत चांगला राहून शेती उत्पादनात सातत्य टिकून राहते, याबरोबरच सेंद्रीय खतांच्या वापरामुळे उत्पादित होणार्‍या शेतमालाचा दर्जा वाढून परदेशात निर्यात करण्यासाठी निकषांची समस्या निर्माण होऊ शकत नाही. याचा फायदा शेतीमालास जादा भाव मिळण्यास होतो, असे श्री. बाबर आर्वजुन सांगतात.

उत्पादित शेतीमालाला चांगला भाव मिळावा यासाठी श्री. बाबर यांनी प्रारंभीपासूनच सेंद्रीय शेती करण्याचा निर्णय घेतला. श्री. बाबर यांनी दीड एकरात दिडशे केशर, हापूस, गुलाल्या व रायवळ जातीच्या कलमी रोपांची लावगड केली. यामध्ये केशर आंब्याची १२० झाडे आहेत. ही झाडे १२ फुटांहून अधिक उंच वाढली आहेत. माण तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असून पाणीटंचाईच्या समस्येवर मात करून सर्व झाडांना ठिबक सिंचनाद्वारे पाणी देवून आंब्याची बाग फुलविली आहे.

सेंद्रीय शेतीसाठी त्यांना कृषि विभागाकडून विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने ठिबक सिंचन संच, गांडूळ खत प्रकल्प, कंपोस्ट खत प्रकल्प यासह इतर प्रकल्पांचा समावेश आहे.

आंबा रोपांची लागवड केल्यापासून आजअखेर ते या फळबागेत रासायनिक खते व किटकनाशकाचा पूर्णत: वापर टाळून नैसर्गिक पद्धतीने बागेची जोपासना गेली दोन वर्ष करीत आहेत. गत वर्षातील फळ हंगामात निर्यातक्षम सर्व निकषांच्या चाचणीत केशर आंबा पात्र ठरल्याने दिडशे रुपये किलो दराने बागेतच व्यापार्‍यांनी खरेदी केली. यंदाच्या हंगामात गत वर्षातील फळांपेक्षा अधिक क्षमतेने दर्जा वाढलेला निदर्शनास आल्याने यंदाही परदेशात विक्रीसाठी निर्यात करण्यास व्यापार्‍यांनी बागेतच आंबा खरेदी करण्यास पसंती दिली.

नैसर्गिक पद्धतीने आंबा बाग जोपासण्याबाबत श्री. बाबर सांगतात की, आंबा हे फळझाड जंगली आहे. पूर्णत: नैसर्गिक पद्धतीनेच जर आंब्याची झाडे जोपासली, फळधारणा त्यानंतर फळाचा आकार व वजन आणि विशेष बाब म्हणजे नैसर्गिक पद्धतीनेच पाड लागल्यानंतर तो पालापाचोळ्यात आच्छादनात पिकविल्यानंतर फळाचा नैसर्गिक रंग व गोडवा व चवही वेगळीच अनुभवयास आली आहे.

नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आंबा लवकर नासत, सडत नाही. रासायनिक कार्बाईडचा वापर करुन जलदगतीने पिकविलेल्या आंब्याचा रंग एकसारखा गडद व आकर्षक असा जरी दिसत असला तरी तो आरोग्यास हानीकारक असा आहे. हा आंबा लवकर सडतो, हा त्यातील फरक आहे. मी व माझी पत्नी बागेची वर्षभर निगा व देखरेख करीत असतो. बागेतील प्रत्येक झाडाला वाळलेले गवत, झाडांचा पालापाचोळा, कुजलेले शेण, तलावातील गाळाची माती एकत्रित मिश्रण करून प्रत्येक रोपाच्या बुंध्याभोवती गोलाकार पसरून ठिबक सिंचनाचा वापर करून पाणी देत आहोत.

बाग लागवडीपासूनच रासायनिक खतांचा वापर श्री. बाबर यांनी टाळला आहे. तसेच झाडावर किटकनाशकांचा वापर केला नाही. झाडाच्या बुंध्याभोवती विविध कडधान्याबरोबरच देशी गाईच्या गोमुत्राची स्लरी जिवामृत वर्षातून तीनवेळा दिले. झाडांना मोहर, फुलोरा आल्यानंतर परागीभवनासाठी मधमाशी व फुलपाखरू यांची भूमिका खूप महत्त्वाची मानली जाते. रासायनिक खताबरोबर विषारी किटकनाशकांच्या वापराचा अतिरेक वाढल्यामुळे पर्यावरण संतुलनात बदल झाला. परिणामी आज शेतमळ्यात शोधूनही फुलपाखरे दिसून येत नाहीत. तरीही उपलब्ध मधमाशीची गरज पाहता बागेलगत पडीक जमिनीत गोदन, कवट, काजू, तुती, आवळा, चिकू, बोर, पेरू, आवळा, हादगा, नारळ, गोड व आंबट चिंच, सरस, अ‍ॅवाकोडा, सिताफळ, रामफळ, देशी केळी, जांभळ व डांबून, फॅशन फ्रुट, इ. प्रकारची देशी-विदेशी फळ-फुलांचीही लागवड केली. यामुळे बागेत मधमाशांचा वावर वाढू लागला. याचा फायदा आंबा बागेस होत आहे.

श्री. बाबर हे उसाचेही पीक सेंद्रीय पद्धतीने घेत आहेत. उसाच्या गुर्‍हाळात गाळण करून रासायनिक औषधे, घटकांचा वापर टाळून पूर्णत: सेंद्रीय गुळ व काकवी उत्पादन करीत आहेत. सेंद्रीय गुळाची व काकवीची बाजारपेठेत मागणी जादा असल्याने अधिकच्या किंमतीमध्ये ते ग्राहक खरेदी करीत आहेत. मागणी जादा व पुरवठा कमी, अशी स्थिती प्रत्येक वर्षी अनुभवयास मिळत असून भविष्यकाळाची गरज ओळखून शेतकर्‍यांनी सेंद्रीय शेतीकडे वळावे, असेही आवाहन ते करतात.

विषमुक्त अन्न म्हणून सेंद्रीय उत्पादित केलेल्या मालाकडे पाहिले जाते. सेंद्रीय मालाला मुंबई, पुणे तसेच जिल्ह्यात मोठी मागणी आहे. मागणीप्रमाणे सेंद्रीय शेती उत्पादन पुरवठा खूप कमी आहे. तसेच सेंद्रीय उत्पादित केलेल्या मालाला चांगला दरही बाजारपेठेत मिळत आहे. जिल्ह्यातील बर्‍याच शेतकर्‍यांनी सेंद्रीय शेतीतून आर्थिक उत्पन्न वाढविले आहे. शेतकर्‍यांनी जास्तीत जास्त सेंद्रीय शेतीकडे वळून विषमुक्त शेती करावी, त्यास सर्वोतपरी सहकार्य कृषि विभाग करेल.

– हेमंतकुमार चव्हाण
माहिती अधिकारी, सातारा


Back to top button
Don`t copy text!