तीन हजारांची लाच घेताना तलाठी व कोतवाल ‘एसीबी’च्या जाळ्यात

दैनिक स्थैर्य | दि. ५ ऑगस्ट २०२६ | सातारा |
बोजा नोंदीसाठी ४ हजार रुपयांची मागणी करून ३ हजार रुपये घेताना राजाचे कुर्ले, ता. खटाव येथील तलाठी व कोतवाल यांना लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाने रंगेहाथ पकडले. मंगळवारी ही कारवाई केली. या दोघांवरही लाचप्रकरणी औंध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

तलाठी विलास पांडूरंग नागरगोजे (वय ५१, सध्या रा. पुसेसावळी ता. खटाव मूळ रा. पाटोदा जि. लातूर) व कोतवाल जगन्नाथ नामदेव उमापे (वय ४९, रा. राजाचे कुर्ले) अशी दोन्ही संशयित आरोपींची नावे आहेत. यातील कोतवालाने तलाठ्यासाठी पैसे स्वीकारले आहेत.

या प्रकरणातील तक्रारदार यांना सहकार क्रेडिट संस्थेचे ५० हजार रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे. मात्र, तक्रारदार यांच्या मिळकतीवर बोजा आहे. त्यासंबंधी ग्रामपंचायत येथे बोजा नोंदीची प्रक्रिया करायची होती. संबंधित प्रक्रियेसाठी संशयित दोघांनी लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी सातारा एसीबीमध्ये तक्रार दिली. एसीबी विभागाने तक्रारीची पडताळणी केली असता लाचेची मागणी होत असल्याचे समोर आले.

लाचेची रक्कम मंगळवारी दि. ४ ऑगस्ट रोजी घेण्याचे ठरल्यानंतर एसीबीने सापळा लावला. त्यानुसार दोन्ही संशयितांना एसीबी विभागाने ताब्यात घेतले. औंध पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

Back to top button
Don`t copy text!