
दैनिक स्थैर्य | दि. 17 जुन 2025 | फलटण | ग्रामीण भागामध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे सुद्धा अतिशय हुशार असून त्यांनी पहिल्यापासूनच न्यूनगंड सोडून आत्मविश्वासाने सर्व स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्याचे आवाहन माजी प्राचार्य रवींद्र येवले यांनी केले.
ज्ञानांजनच्या माध्यमातून शिष्यवृत्ती प्रदान सोहळा हा फरांदवाडी येथील मयुरेश्वर मंगल कार्यालय येथे नुकताच संपन्न झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य रवींद्र येवले बोलत होते. या कार्यक्रमात एकूण ९६,६५० रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली. कार्यक्रमास पंचकोशीतील विविध जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक व पालक उपस्थित होते.
ज्ञानांजन विद्यार्थ्यांना लहानपणापासून स्पर्धा परीक्षांची भीती कमी करण्यासाठी विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन करते. विद्यार्थ्यांच्या प्रमाणात शिष्यवृत्ती दिली जाते. या वर्षी एकूण ४२८२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यातील १२१५ विद्यार्थी फलटण, खटाव अशा ग्रामीण भागातून होते तर उरलेले विद्यार्थी पुणे, चिंचवड अशा शहरी भागातून होते. यावर्षी १,६७,०५० रुपयांची शिष्यवृत्ती ४८७ मुलांना मिळाली. यातील २३७ विद्यार्थी ग्रामीण भागातून येतात
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानांजनच्या स्पर्धा प्रमुख सौ. संगीता देशमुख यांनी केले.
ज्ञानांजनतर्फे सर्वाधिक शिष्यवृत्तीधारक शाळा/संस्थांचा मानचिन्ह देऊन सत्कार केला जातो.
या वर्षी चौथीसाठी ‘ड्रिम्स ॲकॅडमी फलटण’ यांना हा बहुमान मिळाला.
या वर्षीचा ‘ज्ञानांजन कृतज्ञता पुरस्कार’ श्री राजेंद्र लक्ष्मण कर्णे, जि प प्राथ. शाळा पोकळेवस्ती (सोमंथळी) यांना देण्यात आला.
केंद्राचे समन्वयक श्री. सुभाष नाळे यांची बहुमोल मदत यावेळी झाली.
ज्ञानांजनच्या वतीने ज्ञानांजनचे खजिनदार सतीश विप्रदास व पब्लिकेशनच्या प्रमुख अरुणा जोशी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केदार जोशी यांनी केले.