नियमांची कडक अंमलबजावणी करा; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या अधिकाऱ्यांना सूचना


स्थैर्य, पुणे, दि.२१: राज्यात कोरोनाचा धोका वाढत आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे आता प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ही माहिती दिली. कोरोनाचा वाढता धोका पाहता जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनाही काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील कौन्सिल हॉलला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली. यावेळी बोलताना पवार म्हणाले की, ‘कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सूक्ष्म नियोजन करा आणि नियमांची कडक अंमलबजावणी करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

पवार पुढे म्हणाले की, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी गर्दीत जाणे टाळणे, सामाजिक अंतर पाळणे, मास्क, सॅनिटायझरचा वापर आदी प्रशासनाने घालून दिलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. याशिवाय, 200 व्यक्तींच्या मर्यादेत लग्न, कौटुंबिक व राजकीय कार्यक्रम होतील याची दक्षता घ्या. जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालये 28 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवावीत. मात्र अभ्यासिका निम्या क्षमतेने नियम पाळून सुरू राहतील याची खात्री करा. हॉटेल, बार रात्री 11 पर्यंतच सुरू राहतील याची दक्षता घ्या, अशा सूचना पवारांनी दिल्या. या बैठकीला मंत्री दिलीप वळसे-पाटील, मंत्री दत्तात्रय भरणे, खासदार गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, खासदार वंदना चव्हाण, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, तसंच विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!