कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते 7 रथांचा शुभारंभ


स्थैर्य, मुंबई, दि. ७ : केंद्र आणि राज्य शासनामार्फत कौशल्य विकासासाठी कोणकोणते अभ्यासक्रम, योजना राबविल्या जातात, याचा लाभ मिळविण्यासाठी कोठे संपर्क साधावा, महास्वयम संकेतस्थळाद्वारे रोजगार कसा मिळवावा अशा विविध प्रश्नांसंदर्भात माहिती देण्यासाठी आता राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील ३५५ तालुक्यांमध्ये कौशल्य विकास रथाद्वारे जनजागृती केली जाणार आहे. याशिवाय कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांचे समुपदेशनही यामार्फत केले जाणार असून यासाठी तयार करण्यात आलेल्या ७ कौशल्य विकासरथांना झेंडी दाखवून कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री श्री. नवाब मलिक यांनी या मोहीमेचा शुभारंभ केला.

सोच मल्टिपर्पज सोसायटीमार्फत आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या सहयोगातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय परिसरात हा कार्यक्रम झाला. यावेळी रथांच्या शुभारंभाबरोबरच ‘स्कील टु लाईव्हलीहूड कार्निव्हल’ या उपक्रमाचाही शुभारंभ करण्यात आला. कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवी पाटील, सोच मल्टिपर्पज सोसायटीच्या सचिव पल्लवी गांगुर्डे, मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. नॉमदेव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

शुभारंभ करण्यात आलेले कौशल्य विकास रथ हे राज्यातील ३५५ तालुक्यांमध्ये गावोगावी फिरुन जनजागृती करतील. यामध्ये प्रामुख्याने रोजगार उपलब्धतेसाठीचे https://www.mahaswayam.gov.in वेबपोर्टल, ०८०४६८७८३८१ हा टोल फ्री मीस्ड कॉल क्रमांक यांची माहिती दिली जाणार आहे. महास्वयंम वेबपोर्टलवरुन विविध कंपन्या, कॉर्पोरेट्स यांमध्ये रोजगार मिळू शकतो. यासाठी नोंदणी कशी करावी, कागदपत्रे कशी भरावीत आदींसंदर्भात बेरोजगार तरुणांना माहिती दिली जाणार असून त्यांचे समुपदेशनही केले जाणार आहे. याशिवाय कौशल्य विकास विभागाच्या प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, उपजिविकेसाठी कौशल्य संपादन ज्ञान जागरुकता अभियान, किमान कौशल्य विकास कार्यक्रम, प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान आदींचीही माहिती दिली जाणार आहे.

स्वयंसेवी संस्थांना शासनामार्फत संपूर्ण पाठबळ – श्री. नवाब मलिक

कौशल्य विकास मंत्री श्री. मलिक यावेळी म्हणाले की, सोच मल्टिपर्पज सोसायटी या स्वयंसेवी संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. तरुणांना फक्त कौशल्य प्रशिक्षण देऊन चालणार नाही, तर त्यानंतर त्यांना रोजगारही मिळणे आवश्यक आहे. राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत यासाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. मागील वर्षी कोरोनाचे संकट असतानाही रोजगार मेळावे, महास्वयंम वेबपोर्टल यासह विभागाच्या विविध उपक्रमांमधून राज्यात १ लाख ९९ हजार बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे. यापुढील काळातही हे सर्व उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येतील. यासाठी सीएसआरमधूनही मोठे सहकार्य मिळत असून सोच मल्टिपर्पज सोसायटीसारख्या विविध स्वयंसेवी संस्थाही सहकार्य करीत आहेत. सीएसआर आणि स्वयंसेवी संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या अशा सर्व उपक्रमांना शासनामार्फत संपूर्ण पाठबळ देण्यात येईल, असे ते म्हणाले.

कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह म्हणाले की, राज्यात कौशल्य विकासासाठी विविध २५०० पेक्षा जास्त अभ्यासक्रम चालविण्यात येत आहेत. प्रत्येक तरुणाला कुशल बनविणे आणि त्यानंतर त्याला योग्य रोजगार मिळवून देण्यासाठी विभागाने अनेक उपक्रमांच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे. आता यामध्ये सोच मल्टिपर्पज सोसायटीसारख्या स्वंयसेवी संस्थाही पुढे येत आहेत. सर्वांच्या सहकार्यातून राज्यात सर्व योजना प्रभावीपणे राबवू, असे ते म्हणाले.

सोच मल्टिपर्पज सोसायटीच्या सचिव पल्लवी गांगुर्डे यांनी उपक्रमाची माहिती दिली. संस्थेमार्फत राष्ट्रीय पातळीवर रोजगारविषयक विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आता सुरु करण्यात आलेल्या कौशल्य विकास रथामार्फत राज्यातील प्रत्येक तालुक्यात पोहोचून जनजागृती केली जाणार आहे. याशिवाय बेरोजगार तरुणांना वैयक्तिक भेटून त्यांचे आवश्यकतेनुसार समुपदेशनही केले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!