
स्थैर्य, सातारा, दि.२९: सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी त्यांच्या यशस्वी कारकिर्दीत जिहे -कठापुर योजनेला गती दिली.आज ही मंत्री नसतानाही त्यांनी माण-खटावला पाणी देण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. त्यामुळे दुष्काळी भागात उन्हाळ्यात पाणी मिळणार आहे. हा एक प्रकारे दिलासादायक संदेश असल्याचे मत दुष्काळी भागात व्यक्त होत आहे. माण-खटाव दुष्काळी भागातील शेतकरी व इतर जनतेला पाणी देण्यासाठी खऱ्या अर्थाने माजी पालकमंत्री विजय शिवतारे हे दुष्काळी भागातील जनतेच्या मनातील ताईत ठरले आहेत अशी भावना खटाव तालुक्यातील १६ व माण तालुक्यातील १९ गावाच्या परिसरातील ग्रामस्थांची झाली आहे. नेर ते आंधळी धरण असा सतराशे मीटर बोगद्यातून दुष्काळी भागात पाणी पुरवठा करून खऱ्या अर्थाने तहानलेल्या लोकांना पाणी देण्याचे कार्य माजी पालक मंत्री विजय शिवतारे यांनीच केले आहे.१९९६ साली सांगली जिल्ह्यातील विटा, आटपाडी भागाला पाणी देण्यासाठी कराड नजिक कृष्णा नदीच्या काठावर टेंभू योजना सेना-भाजप च्या तात्कालीन सरकारने कार्यन्वित केली होती. त्याला सत्तांतर नंतर खीळ बसली होती. पण,२०१४ साली भाजप-सेनेचे सरकार सत्तेवर आल्यानंतर जलसंपदा राज्य मंत्री तथा सातारा जिल्हा पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दुष्काळी परिस्थितीची जाणीव ठेवून जिहे- कठापुर योजनेला निधी उपलब्ध करून हे काम पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला. त्याचा आता दुष्काळी भागातील दरुज, दरजाई, साते वाडी, पेढगाव,मांडवे, एनकुळ, कणसे वाडी, मायणी येथील सोळा गावे व माण तालुक्यातील १९ गावांना लाभ मिळणार आहे. ”’माजी आमदार डॉ दिलीप येळगावकर यांनी रचला पाया, माजी मंत्री विजय शिवतारे झाले कळस”’ असे वर्णन केले जात आहे. कोणतीही खोटी माहिती प्रसिद्ध न करता जे यश मिळाले हा सत्याचा विजय असल्याची माहिती आता भाजप सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुध्दा देऊ लागले आहेत. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे असे सामाजिक कार्यकर्ते दत्ता केंगरे, रमेश बोराटे,प्रताप जाधव यांनी मत व्यक्त केले आहे. सत्ता नसतानाही माजी पालकमंत्री,माजी आमदार यांनी केलेला अभूतपूर्व प्रयत्न माण-खटावची जनता कदापि विसरणार नाही. हे यानिमित्त सिद्ध झाले आहे.