आरफळ, कण्हेर, धोम, उरमोडीचे आवर्तन मंजूर; पालकमंत्र्यांची शिष्टाई


 

स्थैर्य, कराड, दि.१३: कृष्णा
नदीवरील धोम, बलकवडी, कण्हेर व उरमोडी धरणात शंभर टक्के पाणीसाठा आहे.
रहिमतपूर परिसरातील लाभधारकांनी रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्याची मागणी
पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली होती. त्यावर पालकमंत्र्यांनी
आवर्तनाबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी फोनवरुन वस्तुस्थितीची
माहिती दिली. मंत्री जयंत पाटील यांनी 15 नोव्हेंबरपासून पाणी सुरु
करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

कोरोनाचा प्रादुर्भाव आणि पदवीधर मतदार संघाच्या
निवडणूक आचारसंहितेमुळे आरफळ, धोम, कण्हेर, उरमोडी कालव्याचे पाणी रब्बी
हंगामासाठी मिळण्याबाबत कालवा सल्लागार समितीची बैठक होऊ शकणार नव्हती.
रहिमतपूर परिसरातील आणि आरफळ, कण्हेर, धोम आणि उरमोडी कालवा परिसरातील
लाभधारकांनी रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्याची मागणी पालकमंत्री श्री पाटील
यांच्याकडे केली होती. त्यावर त्यांनी रब्बी हंगाम आवर्तनाबाबत
जलसंपदामंत्री पाटील यांच्याशी चर्चा केली. 

जलसंपदा मंत्री श्री. पाटील यांनी सातारा सिंचन
मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांना सर्व नद्यांमधील पाणी साठा आणि शेतकऱ्यांचे
लाभ क्षेत्राची माहिती घेऊन रब्बी हंगामाचे पाणी 15 नोव्हेंबर पासून सुरु
करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तीन आवर्तनाचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे.
आचारसंहिता संपल्यानंतर कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन रब्बी आवर्तनाची
कार्योत्तर मंजुरी घेण्याबाबतचे पत्र दिले आहे. पालकमंत्री पाटील यांनी
कालव्यातील पाणी सोडण्यासाठी विशेष प्रयत्न केल्यामुळे लाभधारक शेतकऱ्यांनी
त्यांचे आभार मानले. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!