फलटण: सार्वजनिक नळ बंदीवर भीम आर्मीचा आंदोलनाचा इशारा


फलटण नगर परिषदेकडून सार्वजनिक नळ बंद केल्याने पक्षी व प्राण्यांवर परिणाम होत असल्याचा आरोप करत भीम आर्मीने कारवाई थांबवण्याची मागणी केली आहे.

स्थैर्य, फलटण, दि. २९ एप्रिल : फलटण नगर परिषदेकडून अनधिकृत व सार्वजनिक नळ कनेक्शन बंद करण्याची कारवाई सुरू असून, यामुळे शहरातील पक्षी व प्राण्यांच्या जीवनावर परिणाम होत असल्याचा आरोप भीम आर्मीने केला आहे. ही कारवाई तात्काळ थांबवून पाण्याची पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

नगर परिषदेकडून सुरू असलेल्या कारवाईत सार्वजनिक नळ कनेक्शन बंद करण्यात येत आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांसह पक्षी, प्राणी आणि इतर सजीवांच्या पाण्याच्या उपलब्धतेवर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे.

भीम आर्मीच्या मते, सार्वजनिक नळ व पाणवठे हे अनेक सजीवांसाठी पाण्याचे प्रमुख स्रोत होते. हे बंद झाल्यामुळे काही पक्षी व प्राणी पाण्याअभावी त्रस्त होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

ही कारवाई तात्काळ थांबवून वन्य जीव संरक्षण कायद्याचे पालन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच पक्षी, प्राणी आणि तात्पुरत्या वास्तव्यास असलेल्या नागरिकांसाठी पाण्याची तातडीने व्यवस्था करावी, असेही सांगण्यात आले आहे.

जर प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भीम आर्मीने दिला आहे.

या मागणीसाठी अजित संभाजी मोरे, सुनील पवार, तुषार जाधव आणि तेजस भोसले यांनी पुढाकार घेतला आहे.


Back to top button
Don`t copy text!