
फलटण येथे प्रतिसरकारचे संस्थापक क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली. मान्यवरांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
स्थैर्य, फलटण, दि. 4 ऑगस्ट : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आयुष्य वेचणारे थोर स्वातंत्र्यसैनिक आणि प्रतिसरकारचे संस्थापक क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती फलटण येथे साजरी करण्यात आली. त्यांच्या येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म 3 ऑगस्ट 1900 रोजी सांगली जिल्ह्यातील बहे या गावी झाला. 1942 च्या भारत छोडो आंदोलनात त्यांनी सातारच्या जनतेला एकत्र करून इंग्रजांविरुद्ध लढा उभारला. 1943 ते 1946 या काळात 1500 हून अधिक गावांमध्ये त्यांनी प्रतिसरकार स्थापन केले. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या न्यायासाठी लढा दिला.
या जयंतीनिमित्त दशरथ फुले, विजयराव नेवसे, शिवलाल गावडे, बळवंतराव गायकवाड, मधुकर भुजबळ, राहुल शिलवंत, आबा ढोबळे आणि त्रिंबक भोजने यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्यांचे कार्य आणि त्याग आजही नव्या पिढीला प्रेरणा देत आहे, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
