कालबाह्य कायद्याच्या जोरावर राष्ट्रनिर्माण अशक्य : मोदी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.७: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर
प्रदेशातील आग्रा मेट्रो प्रकल्पाचा शुभारंभ केला. गेल्या शतकातील
कायद्यांनी राष्ट्रनिर्माण शक्य नाही, असं म्हणत यावेळी पंतप्रधानांनी कृषी
कायद्यांवर अप्रत्यक्ष भाष्य केलं. मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात
शेतकरी आंदोलन पेटलं असून विरोधकांची एकजूट झाल्याचं पाहायला मिळत आहे.
आग्रा मेट्रो रेल 29.4 किमी लांब असून त्यात दोन कॉरिडोर असतील. ताज ईस्ट
गेटपासून सिकंदरापर्यंत 14 किमी मार्गावर 13 मेट्रो स्टेशन असतील.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, कायदे एका ठराविक काळानंतर ओझी होतात. गेल्या शतकातील कायदे राष्ट्र निर्माण करणार नाहीत.

आता कोरोना लस मिळवण्यासाठी आपल्याला फार
काळ प्रतीक्षा करावी लागेल, असे वाटत नाही. परंतु तोपर्यंत प्रत्येकाला
मास्क आणि दोन गज अंतराचा नियम पाळावा लागेल. शहरांच्या विकासासाठी आम्ही
चार स्तरांवर काम सुरु केले आहे. भूतकाळापासून सुरु असलेल्या समस्यांचे
निराकरण, जीवन अधिक सुलभ करणे, गुंतवणूक वाढावी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा
अधिक वापर झाला पाहिजे.

जेव्हा तुम्ही धैर्य आणि समर्पणाने पुढे
जाता तेव्हा कोणताही अडथळा तुम्हाला रोखू शकत नाही. भारतातील सामान्य तरुण,
भारतातील छोटी शहरे आजही तेच धैर्य आणि समर्पण दर्शवित आहेत, असे वक्तव्य
मोदींनी या कार्यक्रमात केले.

रिअल इस्टेट क्षेत्राच्या परिस्थितीशी आपण
परिचित आहोत. बिल्डर आणि गृह खरेदीदार यांच्यात विश्वासाचे अंतर आले होते.
काही व्यक्तींनी मध्यमवर्गाला त्रास देऊन संपूर्ण रिअल इस्टेट क्षेत्राला
बदनाम केले. ही समस्या दूर करण्यासाठी रेरा कायदा आणला गेला. अलिकडच्या
अहवालांनुसार या कायद्यानंतर मध्यमवर्गीयांची घरं वेगाने पूर्ण होण्यास
सुरुवात झाली आहे.

पायाभूत सुविधा क्षेत्राची एक मोठी समस्या
म्हणजे नवीन प्रकल्प जाहीर तर होतात, परंतु आर्थिक स्त्रोतांकडे फारसे
लक्ष दिले जात नाही. आमच्या सरकारने नवीन प्रकल्प सुरु करण्यासोबतच आवश्यक
निधीची तरतूद करण्याची काळजी घेतली.

नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाइन
प्रकल्पांतर्गत 100 लाख कोटींपेक्षा जास्त खर्च करण्याची योजना आहे.
देशातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी जगभरातील गुंतवणूक आकर्षित करण्याचा
प्रयत्न आहे.

मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटी
इन्फ्रास्ट्रक्चर मास्टर प्लॅनवरही काम केले जात आहे. देशातील पायाभूत
सुविधा सुधारण्यासाठी जगभरातील गुंतवणूक आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे.

आधुनिक सुविधा आणि आधुनिक
कनेक्टिव्हिटीमुळे उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागाची क्षमता आणखी वाढत आहे.
मेरठ ते दिल्ली दरम्यान देशातील पहिली वेगवान रेल्वे वाहतूक व्यवस्था तयार
केली जात आहे. दिल्ली-मेरठ दरम्यान 14 पदरी एक्सप्रेस वे लवकरच
नागरिकांच्या सेवेत असेल

माझे नेहमीच मत आहे की पर्यटन हे एक असे क्षेत्र आहे ज्यात प्रत्येकासाठी
कमाईची साधने आहेत. मला आशा आहे की कोरोनाची परिस्थिती जसजशी सुधारत आहे,
तसतसे लवकरच पर्यटन क्षेत्रही परत रुळावर येईल.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!