…तर एमपीएससीची केंद्रे बंद पाडणार : संभाजीराजे


 

स्थैर्य, नवी मुंबई, दि.८: खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने मराठा समाजाला फसवल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच राज्य सरकार त्यांच्या हातात असणा-या गोष्टीदेखील का करत नाही, असा सवाल केला आहे. ‘सारथी संस्थाही सरकारने बुडीत घातली. अण्णासाहेब पाटील महामंडळाला सरकारने काय दिलं? राज्य सरकारने त्याचा खेळखंडोबा केला. मराठा समाजासोबत ते किती खेळणार? मराठा समाजातील आमदारांनी सुद्धा याची जबाबदारी घ्यायला हवी,’ असे संभाजीराजे यांनी सांगितले.

संभाजीराजे यांनी राज्य सरकारवरही सडकून टीका केली. ते म्हणाले, ‘मराठा समाजाला सरकारनं फसवलं आहे. राज्य सरकारच्या हातात ज्या गोष्टी आहेत त्या ते का करत नाही? आरक्षण हा समतेचा लढा आहे. आरक्षण आमच्या हक्काचं आहे आणि आम्ही ते मिळवणारच. सरकारने सारथी संस्थाही बुडीत घातली. अण्णासाहेब पाटील महामंडळाला सरकारने काय दिलं? राज्य सरकारने त्याचा खेळखंडोबा केला. ते मराठा समाजासोबत किती खेळणार? मराठा समाजातील आमदारांनी सुद्धा याची जबाबदारी घ्यायला हवी.’

‘एमपीएससीमधून ४२७ विद्यार्थी आले. त्यातील १२७ मराठा आहेत, त्यांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. त्याला जबाबदार कोण?’, असा सवाल संभाजीराजेंनी उपस्थित केला. तसेच, सरकार अनेक प्रश्न जाणून बुजून सोडवत नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या मुद्द्यावर बोलताना संभाजीराजे म्हणाले, ‘सिद्धार्थ शिंदे वाईचा मुलगा आहे. तो सध्या कोरोना बाधित आहे. तो कसा परीक्षा देणार? अशा विद्यार्थ्यांचं नुकसान का? परीक्षेला बसणारे २ लाख मुलं कोरोनाबधित झाली तर त्याला कोण जबाबदार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मला कॉल आला होता, मी केला नव्हता. एमपीएससी परीक्षा झाली, तर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील. या मराठा समाजाच्या भावना आहेत.’

‘सरकार परीक्षा घेण्याची घाई का करत आहे? हे षडयंत्र आहे का कळत नाही. ज्यांची वयाची मर्यादा संपेल त्यांच्यासाठी वयाची अट शिथिल करुन वय मर्यादा वाढवा. सर्वांना घेऊन चला. माझी सरकारला विनंती वजा सूचना आहे’, असंही संभाजीराजे यावेळी म्हणाले.

‘समाजाने आपापल्या वकिलांनी काय करायला हवं हे ठरवावं, आंदोलनाची दिशा ठरवावी. मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्य सरकार ऐकत नसेल, तर मराठा समाज एमपीएससीचे केंद्र बंद करेल. अनेक लोकांचे नुकसान झाले आहे. म्हणून महाराष्ट्र बंद करणार नाही. त्यामुळे राज्य सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा’, असा इशारा संभाजीराजेंनी सरकारला दिला.

संभाजीराजे यांनी यावेळी आर्थिक दुर्बल आरक्षणाचा आग्रह करणा-यांवरही हल्ला चढवला. ते म्हणाले, ‘समन्वयक एकमेकांशी भांडतात, काहींना समाजात दुफळी निर्माण करायची आहे. आपल्याला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आर्थिक दुर्बल घटकांमध्ये जायचं असेल तर जा. सर्वांनी जबाबदारी घेणं गरजेचं आहे. धोका झाला, तर याला आज जे आर्थिक दुर्बल घटकात जाण्यासाठी आग्रही असतील तेच जबाबदार असतील’, असंही ते म्हणाले.

संभाजीराजे म्हणाले, ‘आमच्या व्यथा दु:ख समजून घ्या. ९३ टक्के मराठा समाज गरीब आहे. ओबीसी समाजाचे अनेक नेते आले. धनगर समाजाचे मुस्लीम समाजाचे नेते आले. त्यांचं कौतुक आहे. आम्हाला ओबीसीमध्ये घुसायचं नाही. ओबीसी नेते आणि आमच्यात कुठलाही दुरावा होणार नाही. उठसूठ सुशांत प्रकरण, आमच्याकडे पण लक्ष द्यावे अशी मीडियाला विनंती आहे.’

आता संयम राहणार नाही

‘संभाजीराजे आता संयमी राहणार नाही. सकल मराठा समाजाने काही निर्णय घेतले तर त्याला माझं समर्थन आहे. मी कायम तुमच्यासोबत आहे. सगळ्या आमदारांना माझी विनंती आहे की त्यांनी मंत्र्यांना निरोप द्यावेत. मंत्र्यांनी मराठा समाजाची व्यथा, दु:ख यावर कॅबिनेटमध्ये चर्चा करावी. मुख्यमंत्री, मंत्री हे राज्यपालांना मराठा समाजाच्या व्यथा सांगू शकतात. राज्यपाल, राष्ट्रपती यांना सांगून विशेष अधिकार मिळू शकतो’, असंही संभाजीराजे यांनी नमूद केलं.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!