माऊलींच्या पादुकांना दत्तघाटावर नीरास्नान; पालखी सोहळा लोणंद मुक्कामी विसावला

पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्यात जंगी स्वागत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ६ जुलै २०२४ | लोणंद |
ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना आज टाळमृदूंगाच्या गजरात नीरास्नान घालण्यात आले. ‘माऊली माऊली’च्या जयघोषात संत ज्ञानेश्वरांचा पालखी सोहळा आज वाल्हेवरून निघाला. नीरामधील दत्तघाटावर माऊली महाराजांच्या पादुकांना स्नान घालण्यात आले. आज हा वैष्णवांचा मेळा सातारा जिल्ह्यात दाखल झाला. त्यानंतर माऊलींचा पालखी सोहळा लोणंदकडे मार्गस्थ होऊन लोणंदच्या पालखी तळावर विसावला आहे.

हरिनामाच्या जयघोषात आज माऊलींच्या पादुकांना नीरा नदीच्या पाण्यात स्नान घालण्यात आले. या स्नानाला पालखी सोहळ्यात अनन्यासाधारण महत्व आहे. आषाढी वारीत ज्ञानोबांच्या पादुकांना तीनवेळा स्नान घातले जाते. नीरा नदीतून पुणे-सोलापूर जिल्ह्याची सीमा ओलांडून देत, तेव्हा इथं पादुकांना स्नान घातले जायचे. तेंव्हापासूनच्या या परंपरेत खंड पडू नये म्हणून कोरोनाशी निगडित नियमांचं पालन करून ऐतिहासिक नीरा स्नान सोहळा पार पाडला गेला होता.


नीरा नदीवरील दत्त घाटावर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर माऊलींच्या पादुका पालखीतून बाहेर काढल्या गेल्या. नीरा नदीच्या पाण्याने स्नान घातले जाते. गेल्या कित्येक वर्षांची या स्नानाला महत्त्व आहे.

पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्यात आगमन
‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’, ‘माऊली माऊली’, ‘विठ्ठल विठ्ठल’ अशा गजरात व टाळमृदूंगाच्या निनादात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे पुणे जिल्ह्यातून आज सातारा जिल्ह्यात पाडेगाव येथे आगमन झाले. नीरा नदी ओलांडून पालखी सोहळ्याने सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. नीरा नदीच्या पाण्यात ज्ञानोबा माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आले. यावेळी वारकर्‍यांनी माऊली माऊलीचा जोरात गजर केला.


संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळा आळंदी येथून निघाल्यानंतर मजल दरमजल करत आज सातारा जिल्ह्यात दाखल झाला. यावेळी पालखी सोहळ्याचे व वारकर्‍यांचे सातारा जिल्हा प्रशासनातर्फे उस्फूर्त असे स्वागत करण्यात आले. पालखी स्वागतासाठी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

शुक्रवारी पालखी सोहळा वाल्हे येथे मुक्कामास होता. आज सकाळी वाल्हे येथून नीरा मार्गे हा पालखी सोहळा ज्ञानोबा माऊलींच्या नामाचा जयघोष करत नीरा येथे दुपारचा विसावा घेऊन लोणंद येथे सातारा जिल्ह्यात मुक्कामास आला.

पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख, माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण, आ. संजय जगताप, पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पुण्याचे पोलीस अधिकारी पंकज देशमुख, पालखी सोहळा विश्वस्त अ‍ॅड. राजेंद्र उमाप, योगीनिरंजन नाथ यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. तसेच पोलीस विभागाने पालखीला मानवंदना दिली. स्वागतानंतर पालखी सोहळा लोणंद मुक्कामी मार्गस्थ झाला. हा सोहळा सायंकाळी लोणंद मुक्कामी विसावला. पालखी सोहळा आज आणि उद्या लोणंद मुक्कामी असणार आहे.


Back to top button
Don`t copy text!