मातृशोक : पराभवाचा मी ‘मानकरी’

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, दि.२३: नाती – गोती सगळीकडं सारखीच. आई, वडील, भाऊ, बहिण, काका, काकू, मामा, मामी, मावशी, आत्या वगैरे वगैरे असा नात्यांचा मोठा गोतावळा आपल्या सर्वांच्याच अवती – भोवती असतो. मात्र आपलं या सगळ्या नात्यांमध्ये एक वेगळचं, अतिशय घट्ट असं भावनिक नातं असतं ते म्हणजे आपल्या आईशी. हे नातं गमावण्याचं मोठं दुर्भाग्य नुकतंच माझ्या नशिबी आलं. 1 नोव्हेंबर 2020 रोजी माझी आई वयाच्या 62 व्या वर्षी या जगाचा निरोप घेवून आम्हाला सगळ्यांना सोडून गेली. 

माझी आई सौ.प्रतिभा राजेंद्र वाकडे, पूर्वाश्रमीची प्रतिभा यशवंत डिंगरे. आजोबा यशवंत डिंगरे साखरवाडीच्या शेतीमहामंडळात कार्यरत असल्याने भावंडांसह तिचे बालपण साखरवाडी (ता.फलटण) येथील सर्कलवर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गेलं. पुढे लग्नानंतर 20-22 वर्षे पुण्यात तर वडिलांच्या नोकरीतील निवृत्तीनंतर गेल्या 6-7 वर्षांपासून फलटणमध्ये वास्तव्य. वडिलांची खाजगी नोकरी असल्याने तिनी तिचा संसार काटकसरीतच केला. वेळप्रसंगी खाणावळीचा व्यवसाय चालवून संसारात आर्थिक हातभारही लावला. आई जेवढी कष्टाळू तेवढीच धार्मिक वृत्तीची, जितकी स्पष्टवक्ती, घरात हुकुमत गाजवणारी तितकीच सगळ्यांची अतिशय काळजी घेणारी होती. स्वभाव मनमिळावू, सालस, निगर्वी. सतत गप्पा, प्रवासाची विशेष आवड. स्मरणशक्ती अतिशय तल्लख. एखादा जुना घडलेला प्रसंग अगदी तपशीलवार सांगणार. नातलगांमध्ये कार्य-समारंभ असो किंवा दवाखाना आई प्रत्येकाच्या मदतीला लगेच हजर. सोन-नाणं, जमिन-जुमला अशा वैभवाची तिनी कधीच अपेक्षा ठेवली नाही. आम्ही दोघा भावंडांनी चांगलं शिक्षण घ्यावं आणि व्यवसाय अथवा नोकरीत रांकेला लागावं एवढीचं तिची आमच्याकडून अपेक्षा. शिक्षणानंतर मोठा भाऊ नोकरीत आणि मी व्यवसायात कार्यरत असताना कधीच आम्हाला ना पगार विचारला ना आमचे उत्पन्न; ना कशाची कधी मागणी केली. आमचं काम व्यवस्थित चालू आहे ना यातच तिचं समाधान. आयुष्यातला बराचसा काळ पुण्यात गेल्याने साहजिकच आईला पुण्याची ओढ जास्त होती मात्र वडिलांच्या नोकरीतील निवृत्तीनंतर मनाविरुद्ध असूनही फलटणला राहण्यास ती तयार झाली. 

प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणा – मा. ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

आईला सुमारे 20 वर्षापासून मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होता. नियमित चालणे आणि आहारातील पथ्य यामुळे तिचे हे दोन्हीही विकार नियंत्रणात होते. फलटणमध्ये सर्व नातेवाईक तसेच श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज आरती मंडळ, श्रीराम भिशी मंडळ यामध्ये आई – वडिल दोघेही छान रमले होते. मात्र मार्च महिन्यात ‘कोरोना’चा आपल्याकडे शिरकाव झाला आणि एकदमच सगळी परिस्थिती झपाट्याने बदलली. सार्वजनिक उपक्रम, परस्परांच्या गाठी-भेटी, प्रवास सगळचं बंद झालं. मुख्य म्हणजे एप्रिल – मे – जून सलग तीन महिने उद्भवलेल्या भिषण परिस्थितीत नियमितचा फिरण्याचा व्यायाम बंद झाला आणि आईच्या आजारपणाला सुरुवात झाली. 

खरं तर आईच्या मनात पहिल्यापासूनच दवाखान्याबद्दल कमालीची भिती. त्यामुळं किरकोळ दुखणी ती अनेकदा अंगावरच काढायची. आत्ताही जून महिन्याच्या शेवटी – शेवटी कमालीचा अशक्त पणा आल्यानंतरही दवाखान्यात जायला तिचा नकारच होता. पण कशीबशी तिची समजूत काढून दवाखान्यात नेलं. त्यावेळी रक्तातले साखरेचे प्रमाण आणि ब्लड प्रेशर दोन्ही गोष्टी कमालीच्या वाढल्या होत्या. मग गोळ्या, सलाईन, इंजक्शन्स हा सगळा फेरा सुरु झाला मात्र सुमारे महिनाभराच्या उपचारानंतरही तब्येतीत फरक काहीच जाणवत नव्हता. उलट अशक्त पणा आणखी वाढून वजनही भरपूर घटले. त्यानंतर डॉक्टरांनी पुढील तपासणीसाठी छातीचा एक्सरे काढायला सांगितला. मात्र दरम्यानच्या काळात फलटणमध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे छातीचा एक्सरे काढण्यासाठी टाळाटाळ सुरु होती. त्यामुळे एक्सरे निघायला 3-4 दिवस गेले. 9 ऑगस्ट रोजी एक्सरे काढला आणि फुफ्फुसाचा संपूर्ण उजवा भाग क्षयरोगाच्या जंतूंनी ग्रासल्याचे निष्पन्न झाले. सुरुवातीला किरकोळ वाटणारे दुखणे पुढे इतके गंभीर रुप घेईल अशी पुसटशीही शक्यता आम्हाला वाटली नव्हती, कारण ताप, थंडी, सर्दी, खोकला अशी कुठलीच लक्षणं नसल्याने त्याबाजूने विचार अजिबातच झाला नव्हता. 

तरी सेकंड ओपिनियन म्हणून बारामतीला चेस्ट फिजिशियन डॉक्टरांकडे आईला तपासणीसाठी घेऊन गेलो. त्यांनीही हा क्षयरोग असून तात्काळ औषधोपचार सुरु करा म्हणून सांगितले. मग पुन्हा फलटणच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फलटण उपविभागीय रुग्णालयात नोंदणी करुन क्षयरोगावरील प्राथमिक औषधांचा डोस लगेच त्याच दिवशी सुरु केला. क्षयरोग कोणत्या स्टेजचा आहे आणि सुरु केलेली औषधे गुणकारक ठरतील का? या तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयाने थुंकीचे नमूने पुण्याला पाठवले. ‘‘त्याचा अहवाल साधारण 25 दिवसांनी येईल तोपर्यंत प्राथमिक औषधे नियमित सुरु ठेवा’’, असे सांगण्यात आले. दुर्दैवाने 4 सप्टेंबर रोजी क्षयरोग सेकंड स्टेजचा असल्याचा आणि प्राथमिक औषधातील एक प्रकार गुणकारी नसल्याचा अहवाल आला आणि ‘‘पुढील उपचारासाठी वेळ न घालवता तात्काळ पुणे अथवा पाचगणी येथील हॉस्पीटलमध्ये अ‍ॅडमीट करा’’, असे सांगण्यात आले. त्यानुसार पुढे 5 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर असे 14 दिवस आईला पाचगणीच्या बेल एअर रुग्णालयात दाखल करावे लागले.

भराव तुटल्याने कार्वे नळ योजनेस धोका; जॅकवेलला ‘जलसमाधी’ची शक्‍यता!

डिस्चार्ज मिळाल्यावर आईला घरी घेऊन आल्यानंतर तब्येतीत सुधारणा नव्हतीच परंतु, ‘‘आता ट्रीटमेंट योग्य दिशेने सुरु झाली आहे, नियमित औषध घ्या, तुमचा आजार पुढच्या 6 ते 7 महिन्यात 100% संपूर्ण बरा होईल. हळूहळू तब्येतीत सुधारणा होईल.’’, असा दिलासा डॉक्टरांकडून मिळाला होता. त्यामुळे थोडा वेळ जाईल पण सर्व पूर्वपदावर येईल असे वाटत होते. आता बदललेल्या औषधांनुसार आईला नव्याने रोजच्या 12 गोळ्या सुरु झाल्या होत्या. त्यात दुखण्यात भर म्हणून डाव्या पायाच्या शिरेमध्ये दोन रक्ताच्या गाठी झाल्याने पायाला भरपूर सूज आली होती. त्यामुळे हालचालींवर मर्यादा आल्या होत्या. त्याचीही वेगळी औषधे सुरु होतीच. पण आता योग्य औषधोपचारामुळे सर्व ठीक होईल अशी आमच्या सर्वांचीच मनाची समजूत झाली होती. 

या सगळ्या गोंधळात आईची मानसिक स्थिती मात्र कमालीची खचली होती. 24 तास हांथरुणावर झोपून रहावे लागत असल्याने शिवाय आहार कमी आणि औषधं जास्त यामुळे चिडचिड, अस्वस्थता, उष्णता, पित्ताचा विकार वाढला होता. खरं तर आई आजाराला आणि औषधाला इतकी वैतागली होती की, ती वारंवार म्हणायची, ‘‘आता लवकरच सगळं संपणार आहे. माझं काही खरं नाही. औषध सगळी बंद करुन टाका.’’ त्यामुळं आईला मानसिक आधार द्यायचा, आजारा विरोधात लढण्यासाठी खंबीर करायचं, पूर्ण वेळ सेवा करायची आणि तिला या आजारातून बंर करायचंच असा चंग आम्ही बांधला होता आणि तसा सर्वतोपरी प्रयत्नही सुरु होता. शिवाय कोरोनाची भिती लक्षात घेवून त्यादृष्टीनेही सर्व विशेष काळजी आम्ही घेत होतो. 

पुढे ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला पायावरची सुज कमी झाली, थोड्या प्रमाणात भूक वाढली, आमच्या मदतीने उभे राहणे, पाच – दहा पावलं चालणे अशी प्रगती सुरु झाली. फिजिओथेरिपीस्टच्या सहाय्याने रोजचा 15-20 मिनिटांचा व्यायामही सुरु होता. तब्येतीतली ही सुधारणा आमच्या सर्वांनाच दिलासादायक होती. ‘‘आता सगळं ठिक व्हायला सुरुवात झाली आहे, आता थोड्याच दिवसात आई तु बरी होणारेस’’ असं आम्ही तिला अगदी ठाम आत्मविश्‍वासानं सांगत होतो. पण काळाच्या मनात काही वेगळचं होतं. 31 ऑक्टोबरला दुपारपर्यंत सगळं व्यवस्थित असताना आईला अचानक श्‍वास घ्यायला त्रास होवू लागला. पल्स ऑक्सीमीटर ऑक्सीजन लेवल 90 च्या आत-बाहेर दाखवू लागला. डॉक्टरांशी फोनवर बोलण्याची गडबड सुरु असताना पुढच्या 15 – 20 मिनिटातच ऑक्सीजन लेवल 80 च्या घरात गेली. अ‍ॅम्ब्युलन्स बोलावली पण शहरातील नावाजलेल्या प्रमुख डॉक्टरांचे फोन लागत नव्हते. चौकशीअंती शनिवार असल्याने प्रमुख डॉक्टर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नसल्याचे समजले. सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट म्हणजे कोरोनाचे कारण पुढे करुन शहरातील तीन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करुन घेण्यास नाकारण्यात आले. त्यातल्या एका ठिकाणी थोडासा दबाव वापरुन 2-3 तास उपचार घेऊन पुन्हा पाचगणीच्या हॉस्पिटलला रात्री उशिरा नेलेे. रात्री 11:30 च्या दरम्यान पाचगणीला पोचलो पण तोपर्यंत आईची तब्येत आणखी खालावली होती. तिथल्या डॉक्टरांनी, ‘‘इतक्या सिरियस कंडिशनमध्ये तुम्ही फलटणमध्येच उपचार करायला पाहिजे होते. आता उशिर झाला आहे, तरी आम्ही प्रयत्न करतो पण आमच्या हातात काहीही नाही.’’ असे स्पष्ट शब्दात सांगितले. पण आमची भाबडी आशा कायम होती. आम्ही डॉक्टरांना सांगितले, ‘‘तुम्ही उपचार सुरु करा. आमची तुमच्याबद्दल काहीही तक्रार राहणार नाही.’’ मग डॉक्टरांनी ऑक्सीजन, सलाईन, इंजेक्शन सर्व सुरु केले. पण त्यावेळी आईची केवळ श्‍वसनप्रक्रिया सुरु होती बाकी तिच्याकडून कोणताच प्रतिसाद येत नव्हता. तिला खूप हाका मारल्या, बोलत करण्याचा प्रयत्न केला पण फक्त नजर चौफेर फिरत होती; बाकी प्रतिसाद काहीच नव्हता. 1 नोव्हेंबरच्या पहाटे 5:15 च्या सुमारास अचानक तिच्या शरीराची दोनदा जोरजोरात हालचाल झाली आणि संपूर्ण शरीर अचानक स्तब्ध झालं. 

संगळं संपलं आहे, आपली आई आपल्याला सोडून गेली आहे, मागच्या 14-15 तासात होत्याचं नव्हतं झालं आहे याची जाणीव झाली. का झालं, कसं झालं, आपण कुठे कमी पडलो? नियतीनी असा खेळ आपल्याशी कां खेळला? या प्रश्‍नांचे काहूर त्याक्षणापासून आजही मनात माजलेलं आहे आणि या पराभवाचं शल्य मनात कायम राहणार आहे.

बुध येथे तरुणाची दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या

लहानपणी शाळेत सोडायला येणारी, पालकसभेत ‘तुम्ही कोणतीही शिक्षा द्या; माझी तक्रार राहणार नाही’ असं शिक्षकांना कटाक्षानं सांगणारी, आम्हाला खडसावून शिस्तीचे धडे देणारी, खेळताना भांडून आलो तर सुधारण्यासाठी रागवणारी, किरकोळ आजारी पडलो तरी काळजीनं बेचैन होणारी, मोठ्या भावाच्या लग्नसोहळ्यात आनंदात रमलेली, कुटूंबासमवेत प्रवासाचा योग असला की अतिशय खूष असणारी, दैनंदिन व्यवहारातल्या छोट्या – मोठ्या गोष्टींची रोज आठवण करुन देणारी, सतत सगळ्यांची काळजी करणारी, कायम आमच्या आनंदात स्वत:चा आनंद मानणारी, आत्ताच्या गंभीर आजारपणात सतत हाक मारणारी ‘आई’, तुला विसरणे शक्यच नाही ! 

– रोहित वाकडे,

संपादक, साप्ताहिक लोकजागर.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!