पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या मृत्युबाबत धक्कादायक माहिती समोर, सरकारचं सभागृहात लेखी उत्तर


दैनिक स्थैर्य । दि. १७ मार्च २०२३ । मुंबई । रत्नागिरीमधील पत्रकार शशिकांत वारिशे यांचा दुचाकीला अपघात होऊन मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. वारिसे यांचा मृत्यू अपघाती नसून त्यांचा घातपात झाल्याचा आरोप करण्यात येत होता. वारिशे यांच्या दुचाकीला झालेल्या अपघातप्रकरणी पंढरीनाथ आंबेरकर याला अटक करण्यात आली होती. दरम्यान, शशिकांत वारिशे यांच्या मृत्युप्रकरणी राज्य सरकारने आज सभागृहात धक्कादायक माहिती दिली आहे. शशिकांत वारिशे यांची जाणीवपूर्वक अपघात घडवून आणत हत्या करण्यात आली, अशी माहिती राज्य सरकारने आज विधान परिषदेत दिली आहे.

रत्नागिरीमधील प्रस्तावित नाणार रिफायरनी प्रकल्पाविरोधात पत्रकार शशिकांत वारिशे यांनी भूमिका घेतली होती. दरम्यान, वारिशे यांनी पंढरीनाथ आंबेरकर याच्याविरोधात एक बातमी प्रसिद्ध केली होती. ही बातमी प्रसिद्ध होऊन काही तास होण्यापूर्वीच पंढरीनाथ आंबेरकर याची मालकी असलेल्या चारचाकीने शशिकांत वारिसे यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात शशिकांत वारिसे यांचा मृत्यू झाला. दरम्यान, हा अपघात नसून घातपात असल्याचा दावा सुरुवातीपासून करण्यात येत होता. तसेच पंढरीनाथ आंबेरकर यालाही अटक करण्यात आली.

दरम्यान, आज विधान परिषदेमध्ये शशिकांत वारिशे यांना झालेला अपघात आणि मृत्यूबाबत प्रश्व विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाला राज्य सरकारने उत्तर दिलं आहे. शशिकांत वारिसे यांची जाणीवपूर्वक अपघात घडवून हत्या करण्यात आली. याबाबत एसआयटी चौकशी सुरू आहे. तपासामधून याबाबतची अधिकची माहिती मिळेल, असे राज्य सरकारने सांगितले.


Back to top button
Don`t copy text!