
स्थैर्य, सातारा, दि. २२ : पाडळी (ता.सातारा) येथील ग्रामपंचायतीच्या कारभारात विद्यमान महिला सरपंचांचे पती वारंवार हस्तक्षेप करून मनमानी कारभार करत आहेत. याला ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थानी विरोध केला असता त्यांना पोलीस ठाण्यात तक्रार करून अडकविण्याची भाषा वापरली जात असून या ‘सरपंच पतीपासून वाचावा’ अशी मागणी एका निवेदनाद्वारे येथील ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी सातारा जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.
याबाबत त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाडळी गावाला आरक्षणानुसार महिला सरपंच असून सौ. संगीता दत्तात्रय ढाणे या सन २०१५ पासून सरपंच आहेत. मात्र त्या केवळ मासिक सभेलाच उपस्थित असतात. इतर वेळी त्यांचे पती दत्तात्रय भिकाजी ढाणे हेच ग्रामपंचायतीत येऊन कारभार पाहतात. पाडळी ग्रामपंचायतीत ११ सदस्य असूनही ते उर्वरित १० सदस्यांना विचारात न घेता निर्णय घेत आहेत. सरपंच पतीच्या होत असलेल्या हस्तक्षेपामुळे उर्वरित १० सदस्य हे ग्रामपंचायतीत जात नाहीत.
ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत गावची पाणी पुरवठा पाईप ६ के.जी.ची बसविण्याचा ठराव केला असतानाही सरपंच पतींनी ४ के.जी.पाईप मनमानीपणे बसविण्याचा प्रयत्न केला. त्याला सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी विरोध केला. याची तक्रार जिल्हा परिषदेकडे केल्यानंतर पाणी पुरवठा अधिकारी धनावडे यांनी ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्यांची बैठक घेत ६ के.जी.पाईप टाकून देण्याचे मान्य केले. हा सरपंच पतींना अपमान झाला असे वाटून त्यांनी सर्वाना त्रास देण्यास सुरुवात केली आहे.
पोलिसांकडे खोट्या तक्रारी करून पोलिसांकडून धमकविण्यास सुरवात केली आहे. सरपंच संगीता ढाणे या ‘माझे पती माझे पी.ए.असून तेच ग्रामपंचायतीचा कारभार पाहणार’ अशी भाषा वापरत असून त्यामुळे गावचा विकास करण्यास अडथळे येत आहेत. ६ के.जी.पाईपचा ठराव झाला असूनही सरपंच पती हा ठराव झाला नसल्याचे खोटेच सांगून सर्वाना वेठीस धरत आहेत. याबाबत सरपंचांनी स्वतः कारभार पहावा अशी सर्वानी विनंती करूनही सरपंच पतीच्या हस्तक्षेपामुळे गावात तंटा उदभवण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्यातच सरपंच पती पोलिसांत तक्रार करण्याची धमकी देत आहेत. तरी सरपंच पतींपासून वाचवा असे शेवटी या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर उपसरपंचासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.