
दैनिक स्थैर्य । दि. १० मे २०२५ । फलटण । सातारा जिल्हा स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचा जिल्हा आहे. राज्यामध्ये असलेल्या महायुती सरकार हे सर्वसामान्य जनतेचे सरकार नाही; ते जनतेची दिशाभूल करत असून येणाऱ्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषदेच्या निवडणुका ताकदीने लढवा, असे निर्देश राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले.
फलटण येथील श्रीराम एज्युकेशन सोसायटी येथे सदिच्छा भेटी प्रसंगी सपकाळ बोलत होते. यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे फलटण तालुका अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी – बेडके, शहराध्यक्ष पंकज पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना सपकाळ म्हणाले की, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांचा जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्याची ओळख संपूर्ण देशामध्ये आहे. सातारा जिल्हा चव्हाण साहेबांच्या विचारावर मार्गक्रमण करणारा जिल्हा असून या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे विचार हे सर्वसामान्य घरामध्ये पोहोचलेले आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आगामी काळामध्ये केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून दिशाभूल करणाऱ्या योजनांचा पर्दाफाश करावा.
यावेळी फलटण तालुकाध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी – बेडके यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा यथोचित सन्मान केला.