स्थैर्य, सातारा, दि.१७ : छत्रपती शिवाजी महाराज की जय… जय जय रघुवीर समर्थ असा जयघाेष सज्जनगडावरील काेप-या काेप-यात एेकू येऊ लागला आहे. राज्य शासनाने देऊऴ खुली करण्याचा निर्णय घेताच संज्जनगडावर भाविकांसह, पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. शासनाच्या निर्णयाचे सर्वानी स्वागत केले आहे.
सज्जनगड भाविकांसाठी खुला झाला असला तरीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना सध्या तेथे राहता येणार नाही. तसेच भाविकांना प्रसाद भोजना ऐवजी द्रोणातून खिर आणि डाळ तांदुळाची खिचडी प्रसाद म्हणून देण्याचा निर्णय रामदास स्वामी संस्थानच्या वतीने घेण्यात आला असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब स्वामी यांनी दिली.
मंदिरे खुली होताच सज्जनगड येथे भाविक येवू लागले आहेत. अगदी पुणे, कोल्हापूर आणि मराठवाड्यातूनही भाविक गडावर आले आहेत. थंडीमुळे गडावरील वातावरणही आल्हाददायक आहे. त्यामुळे गर्दी वाढण्याची शक्यता आहे. कोरोना काहीसा कमी झाला आहे पण पुर्ण संपलेला नाही. तसेच गडावरील सर्व खोल्या, व्यवस्था बंद होती. त्याची स्वच्छता करायची असल्याने निवास व्यवस्था काही काळ बंद ठेवली जाणार आहे.
भोजन व्यवस्था सुरू ठेवल्यास सुरक्षित अंतर ठेवणे शक्य होणार नाही. म्हणून भाविकांना फक्त द्रोणातून खीर – खिचडीचा प्रसाद दिला जाणार आहे. एकुणच सज्जनगड खुला केल्या बद्दल भाविकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.