हाथरस बलात्कार प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सुपूर्द

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, लखनऊ, दि.११: उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यातील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयने हातात घेतला आहे. आत्तापर्यंत विशेष तपास पथकाकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येते होता. मात्र, रविवारी तपासाची सूत्रे केंद्रीय अन्वेषण विभागाने हाती घेतली आहेत.

हाथरस बलात्कार आणि हत्येच्या घटनेचे देशभर पडसाद उमटले होते. हाथरस घटनेचा तपास सीबीआयकडून व्हावा, अशी शिफारस मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केंद्राकडे केली होती. त्यानुसार तपास सीबीयायकडे सुपूर्द करण्यात आला आहे. हाथरस प्रकरण नीट हातळले नसल्याचा आरोप योगी सरकारवर होत आहे. तसेच पोलीस आणि प्रशासनाने मीडिया आणि विरोधी पक्षाशी अरेरावी केल्यावरूनही योगी सरकार टीकेचे धनी बनले होते. पीडितेचा २९ सप्टेंबरला मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी कुटुंबियांच्या परस्पर मृतदेहावर अंत्यसंस्कार केले होते. तसेच राजकीय नेते आणि माध्यमांना हाथरस जिल्ह्यात येण्यास बंदी घातली होती.

कायदा सुव्यवस्थेचे कारण प्रशासनाने पुढे केले होते. तसेच जिल्ह्यात आणि पीडितेच्या गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रशासनाने आम्हाला दम दिल्याचा आरोपही पीडित कुटुंबियांनी केला होता.राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी हाथरसला जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की केली होती. त्यावरूनही राज्य सरकारवर टीका झाली होती. माध्यमांनी हे प्रकरण उचलून धरले होते. उत्तर प्रदेशसह देशभरात बलात्काराच्या घटनेविरोधात आंदोलन झाले आहे.१४ सप्टेंबरला हाथरस जिल्ह्यात ही हृदयद्रावक घटना घडली होती. पीडिता शेतात गेली असता गावातील चार सवर्ण तरुणांनी तिच्यावर बलात्कार केला होता. यावेळी पीडितेला मारहाण करत गंभीर जखमी केले होते. पीडितेच्या मानेला आणि मणक्याला गंभीर ईजा झाली होती. तसेच तिची जीभही कापण्यात आली होती. दिल्लीत उपचार सुरू असताना १५ दिवसानंतर पीडितेचा मृत्यू झाला होता.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!