नेपाळला चीनपासून सावध राहण्याचा इशारा देताय, आपले काय ते बोला; शिवसेनेने केंद्र सरकारला सुनावले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, मुंबई, दि.१९: ‘चीनने हिंदुस्थानात घुसून
आमच्या भूभागावर अतिक्रमण केले. त्यावर ना संसदेत चर्चा, ना संरक्षण
खात्याच्या स्थायी समितीत चर्चा. चीनच्या घुसखोरीवर चर्चा करा असे
सांगण्यात आले तेव्हा समितीत चर्चा कोणत्या विषयांवर व्हावी? तर लष्कर,
हवाई दल आणि नौदलातील जवानांचे गणवेश बदलण्यावर चर्चा झाली.’ असे म्हणत
शिवसेनेने सामनामधून केंद्र सरकारला सुनावले आहे. नेपाळला चीनपासून सावध
राहण्याचा इशारा देताय, पण आपले काय ते बोला असेही शिवसेनेने म्हटले आहे.

‘भाजपचे
खासदार ना शेतकरी आंदोलनावर बोलत आहेत ना चीनच्या घुसखोरीवर बोलत आहेत. पण
आमचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ नेपाळला चीनपासून सावध राहण्याचा इशारा देत
आहेत. सावध राहण्याची खरी गरज आम्हाला म्हणजे हिंदुस्थानला आहे. नेपाळ
हातचा गेलाच आहे. लडाखमध्ये चिनी घुसले आहेत. त्यांना कसे बाहेर ढकलणार ते
सांगा. ते जास्त महत्त्वाचे आहे!’ असे म्हणत शिवसेनेने बिपीन रावत यांनाही
सुनावले आहे.

सामना अग्रलेखात नेमके काय?

हिंदुस्थानचे सरकार तेव्हा हा प्रकार षंढासारखे बघत राहिले

ऐकावे
ते नवलच असे सध्या आपल्या देशात घडत आहे. चीनपासून सावध राहा, असा इशारा
हिंदुस्थानने म्हणे नेपाळला दिला आहे. आपले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन
रावत यांनी सांगितले आहे, नेपाळने आशियातील श्रीलंकेसह अन्य देशांकडून
शिकायला हवे आणि चीनपासून सावध राहायला हवे! श्रीमान रावतसाहेबांचा सल्ला
चांगला आहे, पण नेपाळचा घास याआधीच चिनी ड्रॅगनने गिळला आहे. नेपाळचा घास
गिळला जात असताना हिंदुस्थानचे सरकार तेव्हा हा प्रकार षंढासारखे बघत
राहिले.

नेपाळमधील हिंदुत्व खतम होत असताना आम्ही काय केले?

नेपाळ
हे जगाच्या पाठीवरील एकमेव हिंदू राष्ट्र. श्रीराम व सीतामाईंशी नात्याने
जोडलेला हा देश, पण नेपाळमधील हिंदुत्व खतम होत असताना आम्ही काय केले?
नेपाळात जाऊन हस्तक्षेप करणे म्हणजे दुसऱ्या देशातील अंतर्गत बाबीत
हस्तक्षेप करणे या सबबीखाली आपण नेपाळचा रंग बदलताना उघडय़ा डोळय़ाने सहन
केला. मग आता नेपाळला फुकट सल्ले देण्यात काय फायदा?

चीनच्या गुंतवणुकीचे काय करावे?

आज
चीन हिंदुस्थानपेक्षा नेपाळच्या जवळ जास्त आहे. चीनने नेपाळची संस्कृती
बदलण्याचा प्रयत्न चालविला आहे. चिनी भाषा शिकवणारे 25,000 शिक्षक
नेपाळच्या गावागावात घुसवले आहेत. चीनने नेपाळला कर्जाच्या ओझ्याखाली दाबले
आहे. नेपाळी जनतेला गुलाम केले आहे. चीन सातत्याने आपले सैन्य आणि आर्थिक
ताकद वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. चीन अब्जावधी रुपयांचे पायाभूत
सुविधांचे प्रकल्प हिमालयन रिजनमध्ये उभारण्याचा प्रयत्न करत आहे.
पाकिस्तान, नेपाळ, मालदिवसारखी राष्ट्रे चीनच्या पकडीत आहेत. श्रीलंकेतही
चीनने मोठी गुंतवणूक केलीच आहे. लडाखमध्ये चिनी सैन्य आज आतमध्ये घुसले
आहे. त्यानंतर चीनच्या गुंतवणुकीचे काय करावे? हा प्रश्न निर्माण झाला.

चीनपासून नक्की सावध कोणी राहायचे?

लडाख
प्रकरण घडले नसते तर चीनचे अब्जावधी रुपये आपल्या देशात आलेच होते व
त्याचे परकीय गुंतवणुकीचे कौतुक करताना मोदी सरकार थकत नव्हते. चीनचे
पंतप्रधान हिंदुस्थान दौऱयावर आले व दिल्लीत न उतरता थेट मोदींच्या गावात
अहमदाबादेत जाऊन झोपाळय़ावर झुलू लागले. तेथे त्यांनी शेव पापडी, गाठे,
ढोकळा खाल्ला. त्या वेळी आम्ही याच स्तंभातून इशारा दिला होता-चीनपासून
सावध राहा! ते खरेच ठरले. डोकलामपासून लडाखपर्यंत चीनने धोकाच दिला आहे.
अरुणाचलमध्ये घुसखोरी सुरूच आहे व लडाखमध्ये घुसून चिनी सैन्याने आमची जमीन
ताब्यात घेतली आहे. त्यामुळे चीनपासून नक्की सावध कोणी राहायचे?

हा मूर्खपणाचा कळस आहे

चीनने
हिंदुस्थानात घुसून आमच्या भूभागावर अतिक्रमण केले. त्यावर ना संसदेत
चर्चा, ना संरक्षण खात्याच्या स्थायी समितीत चर्चा. चीनच्या घुसखोरीवर
चर्चा करा असे सांगण्यात आले तेव्हा समितीत चर्चा कोणत्या विषयांवर व्हावी?
तर लष्कर, हवाई दल आणि नौदलातील जवानांचे गणवेश बदलण्यावर चर्चा झाली.
हिंदुस्थानच्या तिन्ही सैन्य दलास अमेरिकन स्टाईलचे ड्रेस द्यावेत अशी
मागणी भाजपचे खासदार सध्या करीत आहेत. हा मूर्खपणाचा कळस आहे. कश्मीर
खोऱयात रोज दोन-चार जवानांना हौतात्म्य का पत्करावे लागत आहे त्यावर चर्चा
करा म्हटले की हे लोक पळ काढतात. जवानांच्या ड्रेस कोडवर चर्चेचे गुऱ्हाळ
घालणारे हे लोक चीन आमच्या हद्दीत घुसले आहे त्यावर चर्चा करायला तयार
नाहीत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!