
स्थैर्य, फलटण, दि. ३ नोव्हेंबर : भारतीय बौद्ध महासभा, फलटण तालुका शाखेच्या वतीने “दर रविवारी – चला बुद्धविहारी” आणि “आपले संविधान, आपले अधिकार” या जनजागृती अभियानाची सुरुवात समतानगर (विडणी) येथून करण्यात आली. धम्मविचारांद्वारे समाजात बंधुभाव, समता व न्याय रुजवणे आणि भारतीय संविधानातील अधिकारांची जाणीव करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
उपक्रमाच्या सुरुवातीला समतानगर परिसरात ‘मंगल मैत्री’ फेरी काढण्यात आली. यावेळी “भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म” हा ग्रंथ आणि भारतीय संविधानाची प्रत सोबत ठेवून जनजागृती करण्यात आली. यानंतर बुद्धविहारात सूत्र पठण करून उपस्थितांनी संविधानाच्या संवर्धनाची प्रतिज्ञा घेतली.
भारतीय बौद्ध महासभेच्या २५ कलमी कार्यक्रमांतर्गत धम्मप्रसार, शिक्षण, महिला सबलीकरण आणि संविधान जनजागृती हे प्रमुख उद्दिष्ट आहे, असे फलटण तालुका शाखेचे महासचिव बाबासाहेब जगताप यांनी सांगितले. “संपूर्ण तालुक्यात ५६ ग्राम शाखा स्थापन करून हे अभियान राबवले जाईल. प्रत्येक रविवारी बुद्धविहारात एकत्र येऊन ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथाचे वाचन व विचारमंथन केले जाईल,” असेही जगताप म्हणाले.
“धम्म आणि संविधान हे सामाजिक परिवर्तनाचे दोन पाय आहेत. पंचशीलाचे आचरण करून आपण समाज परिवर्तनाला गती देऊ शकतो,” असे मत फलटण तालुका शाखेचे अध्यक्ष महावीर भालेराव यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी ‘पंचशीलानं पवित्र झालं जीवन माझं पुरं’ हे धम्मगीत सादर केले.
कार्यक्रमास विठ्ठल निकाळजे, बजरंग गायकवाड, अमोल भोसले, चंद्रकांत मोहिते, विजयकुमार जगताप, तानाजी जगताप, सोमीनाथ घोरपडे, चंद्रकांत भोसले, अविनाश मोरे, हनुमंत भोसले, नंदकुमार जगताप, जगन्नाथ मोरे, गोरख कांबळे, प्रणव जगताप यांच्यासह उपासक-उपासिका व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामचंद्र मोरे यांनी केले.

