केंद्र शासनाच्या योजनांचा लाभार्थ्यांना त्यांच्या गावातच विविध योजनांचा लाभ द्यावा : ना. अजयकुमार मिश्रा

सुरवडी येथे भारत संकल्प यात्रेचे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. 01 जानेवारी 2024 । फलटण । केंद्र शासनातर्फे अनेक लोककल्याणकारी योजना राबविल्या जात असून त्या सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, असे सांगून केंद्रीय गृह राज्यमंत्री ना. मिश्रा म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून गरजूंना घरे उपलब्ध करून देण्यात आली. शौचालय नसलेल्यांना बांधकामासाठी अनुदान देण्यात आले. जल जीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक घराला नळ जोडणीच्या माध्यमातून शुद्ध पिण्याचे पाणी देण्याचे काम देशात मोठ्या प्रमाणात सुरू आहे पात्र लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ मिळाला नाही अशा लाभार्थ्यांना त्यांच्या गावातच विविध योजनांचा लाभ देणे हा यात्रेचा मुख्य उद्देश आहे, असे ना. मिश्रा यांनी स्पष्ट केले.

केंद्र व राज्य शासनाच्या प्रभावीपणे राबविल्या जात असलेल्या योजनांमुळे आज देशाबरोबर ग्रामीण भागाचाही मोठ्या प्रमाणात विकास झाल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा, माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत सुरवडी तालुका फलटण येथे विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुनील महाडिक यांच्यासह सर्व विभागाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यात्रा जात असलेल्या प्रत्येक गावात अशा नागरिकांचा शोध घेऊन त्यांना लाभ दिला जात आहे. नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही ना. मिश्रा यांनी यावेळी केले.

यावेळी कृषी विभागाच्या योजना, पशुसंवर्धन विभागाच्या योजना, बचत गटाच्या महिलांना धनादेश वाटप, आधार कार्ड अपडेट, आयुष्मान कार्ड काढणे मिश्रा यांच्या हस्ते केंद्र शासनाच्या योजनांचा लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.

खासदार नाईक निंबाळकर म्हणाले, केंद्र शासनाच्या योजनांचा सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात लाभ झाला आहे. कोविड काळात मोफत अन्नधान्य, सर्वांना मोफत कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली. केंद्र व राज्य शासनाच्या प्रभावीपणे राबविल्या जात असलेल्या योजनांमुळे आज देशाबरोबर ग्रामीण भागाचाही मोठ्या प्रमाणात विकास झाल्याचे यावेळी सांगितले.

यात्रेमध्ये पंतप्रधान आवास योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, आयुष्मान भारत कार्ड, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, किसान क्रेडिट कार्ड, सुरक्षा विमा योजना, जीवनज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना, बचत गटांना अर्थसहाय्य, संजय गांधी निराधार योजना आदी विविध योजनांच्या लाभासह माहिती देण्याबरोबर अर्ज भरून घेण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

या यात्रेसाठी एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून स्क्रीनवरून योजनांच्या ध्वनीचित्रफिती प्रसारित करण्यासह योजनांची माहिती देणार्‍या हस्तपत्रिका वितरीत करण्यात आल्या. यावेळी उपस्थितांनी संकल्प शपथ घेतली.

यावेळी विविध विभागांचे अधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!