![](https://i0.wp.com/sthairya.com/wp-content/uploads/2020/12/Farmers_20Agitation.jpg?resize=780%2C470&ssl=1)
स्थैर्य, सातारा, दि.२३: केंद्राने मंजूर केलेला कृषी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे दिल्लीच्या सीमेवर गेली 26 दिवस आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला झोपडपट्टी सुरक्षा दलाने पाठिंबा दिला असून, केंद्र सरकारविरोधात पोवई नाका येथे आज आसूड आंदोलन करण्यात आले. दरम्यान, आंदोलनातील कार्यकर्ते शेतकरी वेशभूषेत सहभागी होत शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, असे फलक हातात घेऊन मोदी सरकारविरोधात घोषणा दिल्या.
आंदोलनात झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट, जिल्हाध्यक्ष शिवाजी भिसे, अशोक खुडे, प्रवीण सपकाळ, सनी ननावरे, सचिन वायदंडे, सागर पवार, अशोक जाधव व इतर उपस्थित होते. पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलनाची सुरुवात झाली.
श्री. वैराट म्हणाले, “”कडाक्याच्या थंडीतही श्रमजीवी शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागण्यांवर लढा सुरू आहे. या आंदोलनात मृत्युमुखी झालेल्या शेतकऱ्यांना शहीद व्हावे लागले, ही बाब मानवतेच्या दृष्टीने काळिमा फासणारी व निंदनीय आहे. शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासंदर्भात केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी राज्यातील पुरोगामी संघटनांनी आंदोलन उभे केले पाहिजे. या आंदोलनातील शेतकऱ्यांवर दंडात्मक कारवाई होत असून, भांडवलशाहीच्या हिताच्या कायद्यामुळे अन्याय होत आहे. त्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरलो असून, पुढील काळात शेतीविषयक केलेले कायदे रद्द करून शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे करावे.”