‘बिरसा मुंडा उत्कृष्ट पेसा ग्रामपंचायत’ निवडीसाठी २९ मे पर्यंत अर्ज सादर करावे – एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आयुषी सिंह

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २२ मे २०२३ । मुंबई । पालघर जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार यांच्या कार्यक्षेत्रातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड व वाडा तालुक्यात मागील तीन वर्षे पेसा निधीची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या उत्कृष्ट पेसा ग्रामपंचायतींची निवड करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत पेसा ग्रामपंचायतींमधून प्रकल्पस्तरावर दहा ग्रामपंचायतींची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी २९ मे २०२३ पर्यंत विवरण पत्रासह अर्ज मागविण्यात आले आहेत, असे सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी आयुषी सिंह यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

विवरणपत्र प्रकल्प कार्यालयात नि:शुल्क उपलब्ध आहेत. २९ मे २०२३ पर्यंत पेसा ग्रामपंचायतींनी विवरणपत्रासह अर्ज सादर करावेत, अर्ज प्रकल्प कार्यालयात सादर करणे तसेच अर्जावर ग्रामसेवक व सरपंचांची स्वाक्षरी असणे बंधनकारक राहील. ग्रामपंचायत पेसा क्षेत्रातील असणे तसेच पेसा अधिसूचनेमध्ये नाव असणे आवश्यक आहे. अर्जासमवेत विवरणपत्र पूर्ण भरणे आवश्यक आहे. अन्यथा अर्ज बाद करण्यात येईल.

प्रकल्पस्तरावरुन निवड समितीमार्फत निवड झालेल्या दहा ग्रामपंचायतींची नावे विभागस्तरावर, अपर आयुक्तस्तरावर सादर करण्यात येतील. तेथे निवड समितीमार्फत निवड झालेल्या पेसा ग्रामपंचायतीला दहा लाख रुपयांचा प्रोत्साहनपर निधी, प्रशस्तीपत्र आणि पदक प्रदान करण्यात येईल. विभागस्तरावर निवड झालेल्या पेसा ग्रामपंचायतींची नावे राज्यस्तरावर सादर करण्यात येतील. तेथे निवड समितीमार्फत निवड करण्यात येणाऱ्या पेसा ग्रामपंचायतींकडून १५ लाख रुपयांचा आराखडा मागवून या आराखड्यास राज्यस्तरीय समितीद्वारे मंजुरी प्रदान करण्यात येईल, असेही प्रकल्पाधिकारी आयुषी सिंह यांनी म्हटले आहे.


Back to top button
Don`t copy text!