रेणू शर्माने धनंजय मुंडेंविरोधात तक्रार मागे घेतल्यानंतर शरद पवार- आम्ही घेतलेला निर्णय योग्यच होता


स्थैर्य, कोल्हापूर, दि.२२: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधातील बलात्काराची तक्रार रेणू शर्मा या तक्रारदार महिलेने मागे घेतली आहे. या घटनेमुळे धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठीही हे दिलासादायक वृत्त आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर तात्काळ प्रतिक्रिया दिली आहे. ‘धनंजय मुंडे यांच्या बाबतीत आम्ही घेतलेला निर्णय योग्यच होता हे आता समोर आलेय’ असे शरद पवार म्हणाले आहेत.

या प्रकरणाविषयी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, ‘धनंजय मुंडें यांच्यावर लावण्यात आलेले आरोप हे निश्चित गंभीर होते. त्यामुळे सत्यता पडताळून पाहण्याची प्रक्रिया पक्षाने सुरू ठेवली. आरोपांच्या मूळाशी जाण्याची गरज आहे, असे मी यापूर्वीच म्हणालो होतो. सत्य समोर आल्याशिवाय निष्कर्षापर्यंत पोहोचण्यात अर्थ नाही. आम्ही योग्य होतो, हे सिद्ध झाले आहे’ असे पवार म्हणाले. कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

काही दिवसांपूर्वी रेणू शर्मा या महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. तसेच पोलिसात तक्रारही दाखल केली होती. यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान गेल्या आठ ते दहा दिवसांत या आरोपांनी सबंध महाराष्ट्र ढवळून निघाला होता. त्यानंतर मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने धनजंय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. पण आता रेणू शर्माने तक्रार मागे घेतली आहे.


Back to top button
Don`t copy text!