टंचाई चार गावांमध्ये टाकीची कामे करण्यास व बहात्तर नळ पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १७ नोव्हेंबर २०२२ । सातारा ।  जल जीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर कॅच द रेन तत्त्वावर पाणी उपलब्ध करून देण्याकरिता स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजना अंतर्गत टंचाईग्रस्त 4 गावांमध्ये साठवण टाकी करण्याचे प्रस्ताव व 72 नळ पाणीपुरवठा योजनांचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी सातारा जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीसमोर ठेवण्यात आले होते. या प्रस्तावांना समितीने मान्यता दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जल जीवन मिशन अंतर्गत झालेल्या या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

केंद्र शासनाच्या पुरस्कृत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम सन 2020 पासून जल जीवन मिशनमध्ये समाविष्ठ करुन पुनर्रचना करण्यात आली आहे.यानुसार ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना सन 2024 पर्यंत प्रत्येक घरात नळाने पाणी (कार्यात्मक नळ जोडणी) या प्रमाणे पाणी पुरवठा करण्यास शासन कटीबद्ध आहे. योजनेची आखणी पुढील 30 वर्षाच्या लोकसंख्येनुसार केली जात आहे.  जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान 55 लिटर प्रती दिन गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करणे हे जल जीवन मिशन योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

सर्व घरांना कार्यात्मक नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा तसेच सार्वजनिक ठिकाणी (महाविद्यालय, अंगणवाडी, आरोग्य केंद्र) शुद्ध तसेच योग्य प्रमाणात पाणी उपलब्ध होणे, 50 टक्के केंद्र व 50 टक्के राज्य शासन वित्तीय आकृतीबंध, 10 टक्के लोकवर्गणी ग्रामपंचायतींना योजनांची देखभाल व दुरुस्ती, पुर्नजोडणी वैयक्तिक गावांच्या योजना व प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचा समावेश, पाणी पुरवठा उद्भवाच्या शाश्वतेसाठी आवश्यक उपाययोजना करणे जसे की बोअरवेल पुनर्भरण संरचना, छतावरील पावसाचे पाणी संकलन इत्यादी. योजना कार्यान्वीत झाल्यानंतर योजनेची मालकी ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीकडे पुढील देखभाल व दुरुस्तीसाठी राहणार आहे हे या योजनेचे ठळक वैशिष्ट्ये आहे.

सातारा जिल्ह्यात एकूण 6 लाख 16 हजार 110 इतकी नळ कनेक्शन देणे अपेक्षित असून त्यापैकी 31 मार्च 2022 पर्यंत 4 लाख 73 हजार 509 नळ कनेक्शन देण्यात आली आहेत. सन 2022-23 साठीचे नळ कनेक्शनचे उद्दिष्ट 70 हजार 577 इतके घेण्यात आले आहे. आजपर्यंत 11 हजार 723 नळ कनेक्शन यावर्षी देण्यात आली आहेत. जल जीवन मिशन अंतर्गत  जिल्हा परिषद कडील 1 हजार 698 योजना असून 319योजनांची कामे पूर्ण झाली आहेत तर  1 हजार 639 योजनांची निविदा कार्यवाही सुरू आहे. 640 योजनांची कामे प्रगतीपथावर  आहे. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या तालुका भेटीमध्ये जल जीवन मिशन अंर्तगतच्या  प्रगतीपथावरील, पूर्ण  झालेल्या कामांची  पाहणी  करणार आहे.


Back to top button
Don`t copy text!