साताऱ्यात १५ व्या ‘विद्रोही साहित्य संमेलना’ची जय्यत तयारी; ९ व १० तारखेला विविध कार्यक्रमांची रेलचेल


 साताऱ्यात ९ आणि १० तारखेला १५ वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन पार पडणार आहे. कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या या संमेलनाची जय्यत तयारी सुरू असून, विविध परिसंवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

स्थैर्य, सातारा, दि. ४ : साताऱ्यात आगामी शनिवारी (ता. ९) आणि रविवारी (ता. १०) होणाऱ्या १५ व्या ‘विद्रोही साहित्य संस्कृती संमेलना’च्या तयारीला आता वेग आला आहे. या दोन दिवसीय संमेलनात चार परिसंवाद, गटचर्चा, विद्रोही शाहिरी जलसा आणि निमंत्रितांचे कवी संमेलन पार पडणार आहे. हे सर्व कार्यक्रम साताऱ्यातील ‘कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात’ होणार असल्याची माहिती चळवळीचे राज्याध्यक्ष कॉ. धनाजी गुरव आणि संयोजन समितीचे स्वागताध्यक्ष हभप डॉ. सुहास फडतरे महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मिरवणूक आणि संमेलनाचे उद्घाटन

शनिवारी (ता. ९) सकाळी ९:०० वाजता पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून संमेलनाची सुरुवात होईल. यावेळी पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या हस्ते मशाल पेटवली जाईल आणि कष्टकऱ्यांचा सत्कार करून भव्य मिरवणुकीला सुरुवात होईल. ही मिरवणूक डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, लहुजी वस्ताद आणि गोल बागेतील थोरले प्रतापसिंह महाराज यांना अभिवादन करून मोती चौकमार्गे संमेलनस्थळी पोहोचेल.

संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. सोनाझरिया मिंझ यांच्या हस्ते होणार असून, संमेलनाध्यक्ष म्हणून शाहीर संभाजी भगत उपस्थित राहतील. यावेळी ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे, गत संमेलनाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, कॉ. किशोर जाधव, कॉ. सिद्धार्थ जगदेव, डॉ. जालिंदर घिगे, साथी नितीन पवार, डॉ. मृणालिनी आहेर, प्रा. मंगला साठे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असेल.

शनिवार (ता. ९) रोजीचे मुख्य कार्यक्रम:

  • दुपारी ३:०० वाजता: ‘छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांनी घडविलेला मराठी धर्म’ या विषयावर नवी दिल्ली येथील डॉ. शरद बाविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद.

  • सायंकाळी ५:०० वाजता: पुणे रमणी प्रेझेंट्स आणि आकाश आप्पा सोनवणे निर्मित ‘तरी आम्ही बोलू नये’ या कार्यक्रमाचे सादरीकरण.

  • सायंकाळी ६:०० वाजता: निमंत्रितांचे कवी संमेलन आणि कवी कट्टा.

  • सायंकाळी ७:०० वाजता: पुरोगामी महाराष्ट्राचा ‘विद्रोही रॅप’ सादरीकरण.

  • रात्री ८:३० वाजता: ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या प्रदीर्घ गाजलेल्या नाटकाचा प्रयोग.

रविवार (ता. १०) रोजीचे मुख्य कार्यक्रम:

  • सकाळी ६:०० वाजता: धम्म पहाट आणि भीमजलशाचे आयोजन.

  • सकाळी १०:०० वाजता: संमेलनस्थळावरील राजर्षी शाहू सभागृहात ‘चल हल्लाबोल’ चित्रपटाचे प्रदर्शन.

  • सकाळी ११:०० वाजता: ‘शिक्षण हक्काचा संघर्ष आणि नवे शैक्षणिक धोरण’ या विषयावर परिसंवाद.

  • दुपारी १२:०० वाजता: डॉ. भारत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘साताऱ्याचे खरेखुरे प्रतिसरकार आणि भारतीय संविधान’ यावर परिसंवाद.

  • दुपारी २:०० वाजता: ‘स्त्रीशक्तीसमोरील आजची आव्हाने आणि या चळवळीत पुरुषांचा सहभाग’ या विषयावर परिसंवाद.

  • दुपारी ४:०० वाजता: ‘एसटी वाचवा-शिक्षण वाचवा’, ‘वनवासी जनजाती नाहीच आम्ही आदिवासी’, आणि ‘भारतीय ज्ञान परंपरा’ यांसह इतर ज्वलंत विषयांवर परिसंवाद आणि गटचर्चा.

  • सायंकाळी ६:०० वाजता: संमेलनाचा समारोप (पद्मश्री लक्ष्मण माने, लोकशाहीर संभाजी भगत, कॉ. सुबोध मोरे, कविवर्य वाहरू सोनवणे यांच्या उपस्थितीत).

  • रात्री ८:०० वाजता: किरण माने यांचा ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ हा विशेष शो.


Back to top button
Don`t copy text!