
दैनिक स्थैर्य । 15 मे 2025। सातारा । राज्य शासनाच्या इतर विभागाच्या राज्य पुरस्कारार्थी यांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवासात सवलत देण्यात येते. त्याप्रमाणे राज्यातील गुणवंत कामगार पुरस्कारप्राप्त कामगारांनाही ही सवलत द्यावी, अशी मागणी राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे सातारा जिल्हाध्यक्ष अशोकराव जाधव यांनी मुख्यमंत्री, कामगार मंत्री व कामगार राज्यमंत्री यांना दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष अशोकराव जाधव, राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या वतीने गोपाळ खजुरी, दिलीप तळेगावकर, जिल्हा कार्याध्यक्ष गजाननराव गाडगे, संजय पवार, अजय राऊत, चंद्रकांत लोहार, संजय गिरी, दादासाहेब काळे, अमृत साळुंखे, शरद वाघमळे, विठ्ठल तांबे व शंकरराव मांढरे उपस्थित होते. याबाबत कोल्हापूर येथे होण्यार्या राज्य कामगार कल्याण मंडळाच्या वतीने विश्वकर्मा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारांच्या वितरणप्रसंगी कामगारमंत्री यांसह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या मागणीचा विचार या मंचावर व्हावा, अशी अपेक्षा पत्रातून व्यक्त केली आहे. अण्णा भाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र, महात्मा गांधी व्यसन मुक्ती पुरस्कार विजेत्यांना प्रवासात सवलत दिली जाते.