नीरा खोऱ्यातील धरणसाठा ९९ टक्क्यांवर स्थिर; वीर धरणातून नदीपात्रात विसर्ग वाढवला

भाटघर धरण १०० टक्के भरलेलेच; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

स्थैर्य, फलटण, दि. ३० ऑगस्ट : नीरा खोऱ्यातील चारही प्रमुख धरणांमधील एकत्रित पाणीसाठा ९९.२० टक्क्यांवर स्थिर असून, परिसरासाठी पाण्याची कोणतीही चिंता राहिलेली नाही. भाटघर धरण १०० टक्के भरलेले असून, पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक सुरू असल्याने वीर धरणातून नीरा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.

नीरा उजवा कालवा विभागाने आज प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, चारही धरणांमध्ये मिळून ४७.९९ टी.एम.सी. पाणीसाठा उपलब्ध आहे, जो एकूण क्षमतेच्या ९९.२० टक्के आहे. गतवर्षी आजच्या दिवशी धरणांमध्ये ९९.२४ टक्के पाणीसाठा होता, त्यामुळे यंदाची स्थितीही अत्यंत समाधानकारक आहे. सध्या भाटघर धरण १०० टक्के, नीरा देवघर ९९.३२ टक्के, वीर ९८.९४ टक्के आणि गुणवडी धरण ९५.६६ टक्के भरले आहे.

धरणांमधील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रशासनाने वीर धरणातून नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढवून तो ४,६१३ क्युसेक्स केला आहे. पाण्याची वाढलेली पातळी लक्षात घेता, प्रशासनाने नदीकाठच्या गावांना पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये किंवा आपली जनावरे सोडू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button
Don`t copy text!