भाजप नेते आनंद रेखी यांच्या नेतृत्वात दिल्लीकर मराठी बांधवांचे स्नेहमिलन!


दैनिक स्थैर्य । दि. ०३ डिसेंबर २०२२ । मुंबई । राजधानी दिल्लीत हजारो मराठी बांधव वास्तव्याला आहेत.विविध क्षेत्रात कार्यरत या दिल्लीकर मराठी बांधवांच्या स्नेहमिलनाचा कार्यक्रम भाजप नेते आनंद रेखी यांच्या नेतृत्वात नुकताच पार पडला.’आनंद फाउंडेशन’च्या वतीने राणी झासी कॉम्पलेक्स, पहाडगंज परिसरात आयोजित या कार्यक्रमात देशाचे अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड,माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, केंद्रीय विभागातील बड्या अधिकाऱ्यांसह शेकडो मराठी बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.

मराठी बांधवांनी राजधानीत त्यांच्या कार्यकतृत्वाचा ठसा उमटवला आहे.संस्कृती, परंपरा तसेच भाषा संवर्धनासाठी त्यांचे एकत्रिकरण महत्वाचे आहे. याच अनुषंगाने यापुढे देखील फाउंडेशनच्या वतीने प्रयत्न केले जाईल,असा विश्वास भाजप नेते आणि फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आनंद रेखी यांनी व्यक्त केला. राजधानीत मराठी बांधवांनी एकत्रित येवून स्थानिक राजकीय शक्ती उभी केली तर प्रत्येकांसाठी एक मोठा आधारस्तंभ निर्माण होईल,असे रेखी म्हणाले.

मोफतची खैरात वाटणाऱ्या पक्षाला अद्दल घडवा-भागवत कराड
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वात देश आत्मनिर्भरतेच्या दिशेने मार्गस्थ आहेत.पंरतु,काही राजकीय पक्ष कलुषीत राजकीय हेतूने मोफतची खैरात वाटत सुटले आहे.अशा पक्षांना धडा शिकवा, असे आवाहन केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी केले.पंतप्रधान देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असतांना गेल्या काही वर्षांत दिल्लीच्या राजकारणात उदयाला आलेला एक पक्ष लोकांना अधिक गरीब बनवून त्यांना गरीबीची सवय लावण्याचे कार्य करीत आहे.अशा पक्षांना मराठी बांधवांनीही धडा शिकवला पाहिजे,असे आवाहन कराड यांनी आम आदमी पक्षाचे नाव न घेता केले.दिल्ली महानगर पालिका निवडणुकीसाठी ४ डिसेंबरला मतदान होणार आहे.त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुन्हा दिल्ली महापालिकेत भाजपला सत्तेत आणण्याचे आवाहन यानिमित्ताने डॉ.कराड यांनी केले.

परप्रांतात संस्कृती संवर्धनासाठी चळवळ आवश्यक-हंसराज अहिर
राजधानीत मराठी संस्कृती संवर्धनाचे कार्य दिल्लीकर महाराष्ट्रीयन करीत आहेत.अनेक मराठी नेत्यांनी केंद्रीय राजकारणात त्यांच्या नेतृत्वाचा ठसा उमटवला असला तरी, कायमस्वरुपी दिल्लीत राहणाऱ्या मराठी बांधवांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा ठसा उमटवण्याचे मोलाचे कार्य केले आहे. अशात परप्रांतात मराठी संस्कृतीच्या संवर्धनासाठी चळवळ आवश्यक असल्याचे मत राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी व्यक्त केले.

यांची प्रमुख उपस्थिती
वैद्य मनोज नेसरी (सल्लागार,आयुष मंत्रालय), मा.घोरपडे साहेब (सल्लागार,केंद्रीय अर्थमंत्रालय), पी.डी.गुप्ता (सेवानिवृत्त न्यायमूर्ती, दिल्ली उच्च न्यायालय), डॉ.राज घोटेकर (संचालक, लेडी हार्डिंग रुग्णालय), एजाज देशमुख (भाजप प्रवक्ते, महाराष्ट्र), समृद्धी देशमुख (अध्यक्षा,मराठी मंडळ), जितेंद्र जैन (चेअरमन,सनराईज सोसायटी)


Back to top button
Don`t copy text!