सद्गुरू पतसंस्थेचे कार्य आदर्शवत – सौ. सुषमा शिंदे

दहिवडी येथील श्री सद्गुरू हरिभाऊ महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचा स्थलांतर व वर्धापनदिन कार्यक्रम उत्साहात संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १५ सप्टेंबर २०२३ | फलटण |
सद्गुरू पतसंस्थेचा चढता आलेख पाहता, पतसंस्थेने सततचा ‘अ’ वर्ग कायम राखला आहे. त्यामुळे सद्गुरू पतसंस्थेचे कार्य निश्चितच आदर्शवत आहे, असे प्रतिपादन माण तालुका सहाय्यक निबंधक सौ. सुषमा शिंदे यांनी केले.

दहिवडी (ता. माण) येथील श्री सद्गुरू हरिभाऊ महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्थलांतर व वर्धापन दिनाच्या निमित्ताने प्रमुख अतिथी म्हणून माण तालुका सहाय्यक निबंधक सौ. सुषमा शिंदे बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले होते. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले, व्हाईस चेअरमन राजाराम फणसे आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना सौ. शिंदे म्हणाल्या, श्री सद्गुरू पतसंस्थेचे कामकाज निश्चितच कौतुकास्पद असून आर्थिक व्यवहाराबरोबरच करत असलेले सामाजिक कार्य हे निश्चितच प्रेरणादायी आहे.

अध्यक्षस्थानावरून बोलताना दिलीपसिंह भोसले म्हणाले की, फलटण शहरात गेली ३५ वर्षांपूर्वी श्री सद्गुरू पतसंस्थेची स्थापना करण्यात आली. या पतसंस्थेच्या विविध शाखा जिल्हा व जिल्ह्याबाहेर कार्यरत असून सभासद व ग्राहक यांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच आज संस्थेची प्रगती दिवसेंदिवस वाढत आहे. संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांबरोबरच आज नेत्रचिकित्सा शिबिराच्या माध्यमातून हजारो रुग्ण आपल्या डोळ्यांनी हे सुंदर आयुष्य पाहत आहेत, हे आम्हासाठी अभिमानास्पद आहे.

दहिवडी कार्यकारी समितीचे चेअरमन व जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष सुभाषराव नरळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. पतसंस्थेचे सीईओ संदीप जगताप यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

कार्यक्रमास महाराजा मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. फलटणचे व्हा. चेअरमन रणजितसिंह भोसले, शिवाजीराव शिंदे, सुभाषराव माने, विजयकुमार शिंदे, चंद्रशेखर गोंजारी, राजेंद्र पांडेकर आदींसह दहिवडी शाखेचे सर्व सदस्य, सभासद व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!