स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार युवा पिढीपर्यंत पोचविण्याची गरज – मंत्री रविंद्र चव्हाण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २९ मे २०२३ । मॉरिशस । एखाद्या कल्पवृक्षाची पाने, फुले, फळे, मुळे उपयुक्त असतात आणि त्या कल्पवृक्षाची सावलीही आपल्याला सुखद गारवा देते, त्याचप्रमाणे  स्वातंत्र्यवीर सावरकर हे कल्पवृक्ष होते. स्वातंत्र्यवीर हे स्वातंत्र्यसैनिक, वकील, कवी, लेखक, साहित्यिक, तत्वचिंतक, समाजसुधारक, दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्व होते. त्यामुळे सावरकर यांचे प्रखर विचार हे आजच्या युवा पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज मॉरिशस येथे केले.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तेजस्वी विचार पुढील पिढीत रुजवण्याचे कार्य अव्याहतपणे सुरु रहावे, म्हणून मॉरिशस येथे स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन आयोजन करण्यात आले आहे. मॉरिशसच्या राजधानीत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आज मंत्री श्री. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. मॉरिशसचे राष्ट्रपती पृथ्वीराज सिंह रूपन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

मॉरिशस आणि महाराष्ट्राचे भावबंध महासागराएवढे गहिरे आणि विशाल आहेत. मॉरिशसच्या मराठी बंधू-भगिनींनी २०० वर्ष आपली हिंदू संस्कृती जपून येथे मराठी भाषा वाढविण्याचे आणि संवर्धनाचे कार्य  केले आहे. येथील सरकारच्या विविध मंत्रालयांना भेटी देत असताना २०१४ नंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसला विशेष मित्रराष्ट्राचा दर्जा दिल्याने भारत आणि मॉरिशसचे भावबंध अधिक दृढ झाले आहेत, असेही यावेळी मंत्री श्री. चव्हाण यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र आणि मॉरिशस यांच्यात व्यावसायिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक ऋणानुबंध वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. त्यातूनच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अर्धाकृती पुतळा महाराष्ट्रातर्फे आम्ही आज भेट दिला आहे. स्वातंत्र्यवीर यांच्या विचारांची ऊर्जा मॉरिशसमधील समस्त मराठी बांधवांना मिळत राहील असेही मंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले.

सावरकरांचे व्यक्तिमत्व हे अष्टपैलू होते. सावरकर हे प्रखर राष्ट्रभक्त होते. त्यांच्या मनात स्वातंत्र्याबद्दलचा जाज्वल्य विश्वास होता. अंदमानच्या कारावासातही सावरकरांनी आपले अजरामर काव्य रचले. अंदमानमधील सेल्युलर जेलमधील भिंतीवर कोरलेले  सावरकरांचे राष्ट्रभक्तीपर काव्य आजही त्यांच्या स्मृतींना उजाळा देत आहे असेही मंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले.

भारत आणि मॉरिशस  या दोन्ही देशांचे संबंध वृद्धिंगत होताना दिसत आहेत. विशेषतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने भारत आणि मॉरिशस हे दोन्ही देश विकासाच्या दृष्टीने अतिशय सकारात्मकरित्या पुढे जात आहेत. मॉरिशस मधील सांस्कृतिक चळवळ ही वृद्धिंगत होताना दिसत आहे, असेही गौरवोद्गार मंत्री श्री. चव्हाण यांनी यावेळी काढले.

या प्रसंगी मॉरिशस हाऊसिंग कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आनंद बब्बीआ, मॉरिशस मराठी सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष आणि मॉरिशस ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनचे मुख्य निर्माते अर्जुन पुतलाजी, मराठी भाषिक संघाचे अध्यक्ष नितीन बाप्पू, मॉरिशस मराठी मंडळी महासंघाचे अध्यक्ष आणि सीएसके असंत गोविंद, खासदार अ‍ॅश्ले  इट्टू,  कला आणि सांस्कृतिक वारसा मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय वारसा निधी संचालक शिवाजी दौलतराव, मॉरिशस मराठी मंडळी महासंघाचे सरचिटणीस बाबुराम देवरा, क्रॉसवेज इंटरनॅशनल, मॉरिशसचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप ठाणेकर आदि मान्यवर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!