
दैनिक स्थैर्य | दि. २ मार्च २०२३ | फलटण |
आज आपण सर्वजण भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत; परंतु खरंच आपल्या देशातील नागरिकांना स्वातंत्र्य मिळाले आहे का? असा प्रश्न पडला असल्याचे फलटणच्या सामाजिक कार्यकर्त्या कु. कांचनकन्होजा खरात यांनी म्हटले आहे. आज महानगरपालिका, नगरपरिषद, एमआयडीसीमधील करांच्या चक्रवाढ व्याजामुळे नागरिकांचे शोषण केले जात आहे. घरपट्टी भरली नाही तर त्याच्यावर प्रतिमहिना २ टक्के दंड चक्रवाढ पद्धतीने नागरिकांकडून वसूल केला जात आहे, असे त्यांनी म्हटले आहे. याबाबतचे निवेदन कु. कांचनकन्होजा यांनी फलटणच्या उपविभागीय अधिकार्यांना दिले आहे.
याबाबत निवेदनात म्हटले आहे की, या प्रश्नांवर आमदारांनी व खासदारांनी विधानसभा, विधान परिषदेत तारांकित प्रश्न विचारून प्रति महिना २ टक्के दराने चक्रवाढव्याज पद्धतीने लादलेला अन्याय तात्काळ दूर करावा, अशी मागणी केली आहे.
पुढे त्यांनी म्हटले आहे की, महानगर परिषदेमध्ये महिलेच्या नावावर घर/संपत्ती असल्यास किंवा एखादा घरातील व्यक्ती अपंग असल्यास त्या कुटुंबाला घरपट्टी करामध्ये ५०% सूट दिली जाते. त्याप्रमाणे संपूर्ण भारतात सर्वच नगरपरिषदा, सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतीमधील नागरिकांना भारतीय संविधानाप्रमाणे समान न्याय तत्वाप्रमाणे, महिलेच्या नावावर घर असल्यास किंवा अपंग व्यक्तीच्या कुटुंबामधील नागरिकास घरपट्टीमध्ये ५०% सूट जाहीर करावी.