राज्य परिवहन महामंडळाची महिला सन्मान योजना सुरू; फलटण आगारात गुलाबपुष्प देऊन महिलांचे स्वागत


दैनिक स्थैर्य | दि. १७ मार्च २०२३ | फलटण |
नुकताच महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात महिलांना एस.टी. बसमध्ये प्रवास करताना ५० % सवलत म्हणजेच अर्धे तिकीट करण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली होती. आज, दि. १७ मार्चपासून वरील योजना प्रत्यक्षात एस. टी. महामंडळाकडून अंमलात आणली जात आहे. या योजनेला ‘महिला सन्मान योजना’ नाव देण्यात आले आहे.

या योजनेच्या शुभारंभानिमित्त फलटण आगारात महिला प्रवाशांचे गुलाबपुष्प देऊन आगार व्यवस्थापक वासंती जगदाळे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. याप्रसंगी सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक रोहित नाईक, सहाय्यक वाहतूक निरीक्षक सुखदेव अहिवळे, धीरज अहिवळे, वाहतूक नियंत्रक संजय उराडे, हनुमंत जाधव, नितीन गोतपागल, वाहक श्रीपाल जैन व कार्यशाळा कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी आगार व्यवस्थापक वासंती जगदाळे यांनी महामंडळाच्या महिला सन्मान योजनेची माहिती देऊन महिलांना शुभेच्छा दिल्या. तसेच जास्तीत जास्त महिला प्रवाशांनी एस.टी. बसने प्रवास करावा, असे आवाहन केले.


Back to top button
Don`t copy text!