![](https://i0.wp.com/sthairya.com/wp-content/uploads/2020/11/deshmukh2_0.jpg?resize=455%2C256&ssl=1)
स्थैर्य, सातारा, दि.२३ : पुणे पदवीधर मतदारसंघात विरोधकांना बंडखोरी थोपविण्यात अपयश आलेले आहे, तर या मतदारसंघातील राष्ट्रवादीचे काही आमदार महाविकास आघाडीचा उमेदवार सोडून अपक्षांसोबत फिरताना दिसत आहेत. एकूणच महाविकास आघाडीविषयीची नाराजी या निवडणुकीत मतपेटीतून दिसेल, असा गौप्यस्फोट पुणे पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत केला.
साताऱ्यात श्री. देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, “”या मतदारसंघातून भाजपचे 24 वर्षे प्रतिनिधित्व केले. प्रकाश जावडेकरांनंतर चंद्रकांत पाटील यांचा त्यात समावेश आहे. भाजप सरकारने या मतदारसंघातील पदवीधरांचे अनेक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. अजूनही काही प्रश्न बाकी आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा बॅंक, विविध संस्थांच्या सामाजिक वारसा, तसेच तेथील अनुभवाच्या जोरावर येणाऱ्या काळात आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना दिसेन.” भाजपच्या सत्ता काळात नोकरभरतीचा प्रश्न होता. तो प्रश्न निकाली लागला असता तर पदवीधरांच्या नोकरीचा प्रश्न सुटला असता; पण आता सरकारने एखादे महामंडळ पदवीधरांसाठी काढावे. शासनाचा एक स्वतंत्र विभाग काढावा, त्यातून पदवीधरांचे प्रश्न निकाली काढण्यात यश येऊन त्यातून एक चळवळ निर्माण होईल, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
जिल्ह्यातील 147 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 2 बाधितांचा मृत्यु
साताऱ्यातील दोन्ही राजांची मदत घेणार का, या प्रश्नावर ते म्हणाले, “अजिंक्यतारा कारखान्यावर शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत मेळावा झाला. उदयनराजे आमच्यासोबत उद्या येणार आहेत. साताऱ्याचे दोन्ही महाराज हे आमचे आदराचे स्थान असून, ते आम्हाला या निवडणुकीत आशीर्वाद देण्यासाठी कायम पाठीशी राहतील.” पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपचे मूळचे केडर सक्षम आहे. भाजपच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी पदवीधरांच्या घरी जाऊन मतदार नोंदणीसाठी पुढाकार घेतला होता. माझा आणि सातारा जिल्ह्याचा दोन पिढ्यांचा ऋणानुबंध आहे. माझ्या वडिलांनी कऱ्हाड न्यायालयात वकिली केली. माझे शिक्षणही कऱ्हाड शहरात झाले आहे. सातारा जिल्ह्यात भाजपचे संघटन आहे. सध्या आम्ही पदवीधरांच्या गाठीभेटी, मेळावे घेऊन आमची भूमिका पोचवत आहोत. माझ्या विजयात सातारा जिल्हा आघाडीवर असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सदाभाऊ खोत हे आमचे नेते आहेत. त्यांची नाराजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दूर केल्याने मतभेद मिटवून ते पुन्हा कामाला लागले आहेत.