![](https://i0.wp.com/sthairya.com/wp-content/uploads/2020/11/4Shirwal.jpeg?resize=504%2C284&ssl=1)
स्थैर्य, शिरवळ, दि.९: टायको कंपनीच्या मागणीप्रमाणे 20 कामगारांची यादी शिरवळ ग्रामपंचायतीकडून दिले जात नसल्याने येथील कामगारांच्या वतीने पाच नोव्हेंबरपासून ग्रामपंचायतीसमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. यामधील उपोषणकर्ते विजेंद्र गुंजवटे, शंभूराज नेवसे, अनिल गावडे, अजय कांबळे व उमेश जाधव या पाच जणांची प्रकृती खालावली असल्याने शिरवळ प्राथमिक आरोग्य केंद्राने त्यांना दवाखान्यात दक्षता विभागात उपचार घेण्यास सांगितले. मात्र, यास उपोषणकर्त्यांनी नकार दिला आहे. दरम्यान, लॉकिम कामगार युनियन संघटना व शिरवळ महिला बचत गटाने या उपोषणास पाठिंबा जाहीर केला आहे.
टायको कंपनीसमोर तीन फेब्रुवारीला आंदोलन केल्यानंतर 20 कामगार कंपनीकडील व 20 कामगार ग्रामपंचायत सदस्याकडून कायम करणार, तर 30 कामगारांना सहा- सहा महिन्यानंतरचा ब्रेक न देता कायम कामावर ठेवणार असल्याचे कंपनी प्रशासनाकडून कळविण्यात आले.
यामधील ग्रामपंचायत सदस्याकडून यादी न आल्याने प्रक्रिया थांबविल्याने कामगारांकडून ग्रामपंचायतीला पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने गेले चार दिवसांपासून शिरवळ येथे उपोषण सुरूच ठेवण्यात आले आहे. ग्रामपंचायतीने 20 जणांची यादी त्वरित द्यावी, अशी मागणी उपोषणकर्ते कामगारांची आहे. दरम्यान आज (साेमवार) यावर ताेडगा निघेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.