निपाणीच्या पोरीनं जिंकलं दिल्लीचं तख्त; सुप्रियाची सैन्य दलात फिनिक्स भरारी


स्थैर्य, सातारा, दि २६: ‘न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरतं..’, असं काहीसं निपाणीच्या सुप्रिया घाटगेनं सिध्द करुन दाखवलं आहे. वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षात भारतीय सैन्य दलात भरती होऊन सुप्रियाने निपाणीकरांची मान अभिमानाने उंचावली आहे. या तिच्या दैदिप्यमान कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मनात जिद्द असली की, कोणतही यश सहजरित्या पूर्ण करता येतं, असं सुप्रियाने वेळोवेळी करुन दाखवत इतर मुलींसमोर आदर्श निर्माण केला आहे. निपाणीत राहणाऱ्या मंगळवार पेठेतील घाटगे कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असल्याने वडील रवींद्र घाटगे हे गवंडीकामासह हॉटेलमध्ये आचारी होते. वडिलांच्या कामावरतीच घाडगे कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालायचा. ह्या सगळ्या परिस्थितीचा भार सोसतच सुप्रियाने घेतलेली फिनिक्स भरारी निश्चितच कौतुकास्पद मानली जात आहे.

सुप्रियाचे प्राथमिक शिक्षण मराठा मंडळ हायस्कूलमध्ये झाले. अर्जुननगर (ता. कागल) येथील देवचंद महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. तिथे दोन वर्षे एनसीसीमध्ये सहभाग घेतला. प्रारंभापासूनच सुप्रियाने सैन्यभरतीचे स्वप्न उराशी बाळगत प्रयत्न केले. यासाठी तिला देवचंद महाविद्यालयातील एनसीसी प्रमुख प्रा. डॉ. अशोक डोनर व कुटुंबीय, मित्र परिवाराने वेळोवेळी सहकार्य केले. आज भारतीय सैन्य दलात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिलांचा सहभाग देखील उल्लेखनिय असून त्यास ग्रामीण भागात देखील प्रतिसाद मिळत आहे. सैन्य दलात भरती होण्याचे महिलांचे प्रमाण वाढल्याने सर्वच भारतीयांसाठी ही आनंददायी बाब आहे, कारण यापूर्वी मुलींवरती ‘चूल आणि मूल’ इतकीच जबाबदारी असायची. मात्र, आता ती यापुढे जावून विविध क्षेत्रात आपला चोख ठसा उमटविताना दिसत आहे.

काम करणाऱ्या कुटुंबातील सुप्रिया रवींद्र घाटगे हिने दाखवून दिले आहे. सुप्रियाची बीएसएफमध्ये पोलिस म्हणून निवड झाली. अशी भरती होणारी सुप्रिया ही निपाणी शहरातील पहिलीच युवती आहे. हे करतानाही बारावी आणि बीएससीत चांगले गुण मिळवले. दरम्यान, वडिलांचा हृदयविकाराने आकस्मिक मृत्यू झाल्याने कुटुंबाची जबाबदारी आई अर्चना यांच्यावर पडली. घरातील कर्ती व्यक्ती निघून गेल्याने न डगमगता आईने पापड केंद्रात काम करून मुलीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घेतलेली मेहनत अवर्णनीय आहे. सुप्रियाचा भाऊ सुशांत उच्चशिक्षित झाला आहे. ह्या सर्व परिस्थितीचा सुप्रियाने धिटाईने सामना करुन आपल्या ध्येयापर्यंत गरुड झेप घेण्यात ती यशस्वी झाली आहे. वडिलांच्या निधनानेही खचून न जाता सुप्रियाने उमेदीला कधीच हारु दिले नाही. ती सतत प्रयत्न करत राहिली आणि ती जिंकली सुध्दा!

सुप्रियाच्या वाटेत अनेक अडथळे आले; पण ती कधीच डगमगली नाही. तिने अनेक संकटांचा प्रकर्षाने सामना केला. दररोज सकाळी उठून व्यायामापासून ते घरच्या स्वयंपाकापर्यंत तिने सर्व जबाबदाऱ्या लिलया पार पडल्या. हे सगळं करत असतानाच तिच्या वडिलांचे निधन झाले. मात्र, तिने भरतीचा नाद कधीच सोडला नाही, ती सततच्या प्रयत्नात यशस्वीच होत राहिली आणि तिने जीवनातील हरेक मैदान फतेह करत गेली.

माझ्या यशात माझ्या कुटुंबियांचा खूप मोठा वाटा आहे, खास करुन माझ्या आईचा!, जिच्यामुळे मी सैन्य दलाची रेस जिंकू शकले. सैन्य भरतीचा हा माझा पहिलाच प्रयत्न होता, त्यात मी यशस्वी झाले. मला निश्चित खूप अभिमान आणि तितकाच आनंदही वाटत आहे. माझे तरुणींना एकच सांगणे असेल, त्यांनी देखील भारतमातेची सेवा करण्यासाठी सज्ज व्हावे.
-सुप्रिया घाटगे, निपाणी

सध्याच्या कलियुगात मानवी दृषकृत्याचं प्रमाण इतकं वाढलं आहे की, देशाच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर असतो. असे भितीदायक वातावरण असतानाही जे या भितीची झळ सामान्य माणसाला लागू देत नाहीत असे आपल्या देशाचे सैनिक दिवस-रात्र मातृभूमीच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर असतात. त्यात आता महिला देखील हिरिरीने सहभाही होत आहेत, ही अभिमानाची बाब आहे. आमचे देवचंद काॅलेजच्या माध्यमातून महिलांच्या सैन्य भरतीसाठी नेहमीच प्राधान्य आहे. सुप्रियाने केलेल्या कामगिरीचा खूपच अभिमान आहे, तीने संपादन केलेले यश इतर मुलींसाठी प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारे आहे.
-प्रा. डॉ. अशोक डोनर, देवचंद महाविद्यालय, अर्जुननगर, निपाणी


Back to top button
Don`t copy text!