
दैनिक स्थैर्य | दि. 16 एप्रिल 2025 | मुंबई | फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रलंबित असलेले पाण्याचे सर्व प्रश्न येणाऱ्या काही दिवसात मार्गी लागत असून विधानसभेची पुढची होणारी निवडणूक ही पाणी प्रश्नावर होणार नाही याची खात्री आम्हाला सर्वांना आहे, असे मत माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दालनामध्ये फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघासह माळशिरस व सांगोला तालुक्याच्या पाणी प्रश्नाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजी पाटील यांच्यासह फलटण, कोरेगाव, माळशिरस व सांगोला तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याबाबत अधिक माहिती देताना माजी खासदार रणजितसिंह म्हणाली की, फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमधील कोरेगाव तालुक्यातील 26 गावांना कायमस्वरूपी पाणी मिळण्यासाठी धोम कालव्याच्या माध्यमातून पाणी देण्यात येणार आहे. यासाठी धोम कालव्यात 0.52 टीएमसी राखीव करण्याचा निर्णय सुद्धा सदरील बैठकीत घेण्यात आला आहे.
फलटण तालुक्यातून जाणाऱ्या धोम – बलकवडीच्या कॅनॉल हा 100% चार्ज होण्यासाठी वाघोशी येथे पुन्हा कालवा जोड प्रकल्पाद्वारे जोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामुळे धोम – बलकवडी कॅनॉल हा 100% क्षमतेने सुरू होणार आहे. आता तो 50% क्षमतेने सुरू असतो. यापूर्वी फलटण तालुक्याला पाणी मिळण्यासाठी उतरोली या ठिकाणी नीरा देवधरचा कॉनॉल हा धोम बलकवडीच्या कॅनॉलला जोडला आहे त्याचप्रमाणे वाघोशी या ठिकाणी जोडण्यात येणार आहे, अशी माहिती सुद्धा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.
फलटण तालुक्यामध्ये नीरा देवधर कालवा प्रकल्पाचे उर्वरित काम हे येणाऱ्या १५ दिवसात पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय सुद्धा सदरील बैठकीत घेण्यात आला आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये सदरील काम सुरू होऊन पूर्णत्वास गेल्याने फलटण तालुका हा 100% बागायती तालुका म्हणून नावारूपास येणार आहे. या सोबतच येणाऱ्या निवडणुकांमध्ये पाणी प्रश्नावर फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक होणार नसल्याचे सुद्धा मत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केले.
यासोबतच अधिक माहिती देताना रणजितसिंह म्हणाले की, माळशिरस तालुक्याच्या पाण्याच्या वाट्या मधून माळशिरस तालुक्यातीलच 16 गावांना पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामुळे माळशिरस तालुक्यामधील संबंधित गावांचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे.
पाणी प्रश्नावर आजी – माजी आमदार एकत्रित आणण्यामध्ये माजी खासदार रणजितसिंह यांना यश
सांगोला तालुक्याच्या पाणी प्रश्नाबाबत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आवाज उठून सदरील पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केलेला आहे या पाठपुराव्याला यश आले असून सांगोला तालुक्याच्या बचतीच्या पाण्यामधून सांगोला तालुक्यातील आवश्यक गावांना पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामुळे सांगोला तालुक्यातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे सदरील निर्णयामुळे सांगोला तालुक्याचे आजी-माजी आमदार एकत्रित आणण्यामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना यश आले आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दालनात झालेल्या बैठकीमध्ये विद्यमान आमदार बाबासाहेब देशमुख तर माजी आमदार शहाजी बापू पाटील यांना एकत्रित आणत सांगोला तालुक्याचा पाणी प्रश्न माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मार्गी लावलेला आहे.
बासनात गुंडाळलेला सोळशी धरण प्रकल्प रणजितदादांनी दिले पुनर्जीवन : आमदार सचिन पाटील
सोळशी धरण हा प्रकल्प एवढ्या वर्षात कुणालाही माहीत नव्हता. अगदी जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांना सुद्धा सदरील प्रकल्पाची माहिती नव्हती. इंग्रज काळामध्ये सोळशी धरणाचा सर्वे करण्यात आला होता. सदरील सोळशी धरण प्रकल्प हा येणाऱ्या काही दिवसात मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. व सदरील सोळशी धरण प्रकल्प सुद्धा पूर्णत्वास जावून कोरेगाव तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे, असे मत आमदार सचिन पाटील यांनी व्यक्त केले.