छत्रपती शिवाजी कॉलेजच्या मराठी विभागाची एहसास संस्थेस भेट, जपली सामाजिक बांधिलकी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १७ मार्च २०२३ । सातारा । येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ ,सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजच्या मराठी विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी यांनी शनिवार दिनांक ११ मार्च २०२३ रोजी साताऱ्यापासून जवळ असलेलेल्या शेंद्रे-वळसे परिसरातील एहसास मतिमंद मुलांचे बालगृह -पुनर्वसन केंद्रास भेट दिली. शिक्षण विस्तार कार्यक्रम अंतर्गत तेथील विद्यार्थ्यांना भेटून तेथील दिनक्रमाची माहिती सर्वांनी घेतली. इतनी शक्ती हमे देना,मन का विश्वास कमजोर ना होना या प्रार्थनेत भावमग्न झालेल्या विद्यार्थ्यांच्या भावना विद्यार्थ्यांनी समजून घेतल्या. तसेच मतिमंद विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून आपली कला कॉलेज विद्यार्थ्यांना दाखवली. आत्मविश्वासाने कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घेत नृत्य सादर करणारे एहसासचे विद्यार्थी पाहून कॉलेज विद्यार्थ्यांनी त्यांचे कौतुक केले. तसेच कॉलजच्या मराठी विभागातील समीक्षा चव्हाण विद्यार्थिनीने त्यांना बाजीप्रभू देशपांडे
यांचा पोवाडा अभिनयासहित सादर केला तेंव्हा विद्यार्थी व एहसासचे अध्यक्ष व व्यवस्थापक यांनी तिचे अभिनंदन केले. एहसासच्या विद्यार्थी व विद्यार्थिनीनी विविध क्रीडा,सांस्कृतिक स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल त्यांचा मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुभाष वाघमारे, डॉ.कांचन नलवडे, डॉ.विद्या नावडकर,.डॉ.संजयकुमार सरगडे,प्रा.प्रियांका कुंभार,प्रा.श्रीकांत भोकरे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. एह्सासचे विद्यार्थ्यांना गणवेश घेण्यासाठी प्राध्यापक व विद्यार्थी मिळून आर्थिक मदत करण्यात आली. तसेच डॉ.सुभाष वाघमारे यांनी समाजमाध्यमात मदत मिळणेकामी आवाहन केले.त्याला प्रतिसाद देत अनेकांनी एहसासचे कार्यास सहकार्य करण्याचे सुरु केले आहे. एहसास मतिमंद बालगृहाचे संस्थापक श्री.संजय कांबळे यांनी सर्वांचे स्वागत करून मराठी विभागास बालगृहाची माहिती दिली. सदरची एहसास ही संस्था विनानुदानित असून लोकसहकार्य घेऊन चालवली जात असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना एक वेगळे जीवनदर्शन घडवणे आणि त्याद्वारे त्यांच्या संवेदना जागवत सामाजिक जाणीव निर्माण करणे ह्या हेतूने विद्यार्थ्यांची एहसास भेट घडवून आणण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर ,गुणवत्ता हमी कक्ष विभाग यांचे या भेटीसाठी मार्गदर्शन लाभले. या भेटीचे वेळी अधीक्षिका रजनी कांबळे, शिक्षिका सोनल वाघ,संतोष जाधव,मानेमावशी,शुभम गुरव,गुरव मावशी इत्यादी उपस्थित होते. बालगृहातील १८ वर्षाच्या मुलांसाठी शेती प्रशिक्षण ,पणत्या बनविणे ,सुशोभिकरन वस्तू बनविणे, फुले तयार करणे व्यवसाय प्रशिक्षण दिले जात असून मुले सोयाबीन ,भुईमुग ,पावटा.घेवडा ,उस इत्यादी पिके घेत आहेत. मुलांना स्वावलंबी व आत्मविश्वासू बनवली जात असून त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी एहसास संस्था प्रयत्न करत असल्याबद्दल मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी सांघिक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत धन्यवाद दिले.


Back to top button
Don`t copy text!