जरांगेंच्या मुंबई आंदोलनाला सदावर्तेंचा तीव्र विरोध; दोन जन्म झाले तरी मागण्या मान्य होणार नाहीत

मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील उपोषणाच्या घोषणेनंतर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध करत न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला आहे.

स्थैर्य,सातारा, दि. १३ सप्टेंबर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेले आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करण्याची घोषणा केल्यानंतर राजकीय आणि कायदेशीर वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेऊन या आंदोलनाला कडाडून विरोध दर्शवला आहे. जरांगे यांच्या मागण्या बेकायदेशीर असून दोन जन्म झाले तरी त्या मान्य होऊ शकत नाहीत, असा दावा करत त्यांनी या आंदोलनाविरोधात न्यायालयात कायदेशीर तटबंदी उभारणार असल्याचे स्पष्ट केले.

गणेशोत्सवाच्या काळात आंदोलनाला आक्षेप

गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबईत आंदोलन पुकारून सणाच्या काळात विघ्न आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप सदावर्ते यांनी केला आहे. या आंदोलनामुळे मुंबईतील शाळा, वाहतूक आणि कायदा-सुव्यवस्थेवर विपरीत परिणाम होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. तसेच या विषयावर विरोधी पक्षातील प्रमुख नेते गप्प का आहेत, असा सवाल उपस्थित करत गणेशभक्त आणि नागरिक ही दडपशाही सहन करणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.

आझाद मैदानावरील उपोषणावर कायदेशीर प्रश्न

आझाद मैदानावर संध्याकाळी ५ वाजेनंतर आंदोलनाला परवानगी नसते, त्यामुळे जरांगे यांचे उपोषण कायद्याचे उल्लंघन ठरेल, असे सांगत याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे सदावर्ते यांनी जाहीर केले. कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी करत त्यांनी जरांगे पाटील यांनी महाराष्ट्राची माफी मागून मुंबईत येण्याचा निर्णय मागे घ्यावा, असे आवाहन केले.

Back to top button
Don`t copy text!