
कोळकी येथे माने परिवाराच्या वतीने परित्राण पाठ व धम्मदीक्षा समारंभ श्रद्धा व शांततेत पार पडला. ११ उपासक-उपासिकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.
स्थैर्य, कोळकी (फलटण), दि. 20 जानेवारी : फलटण तालुक्यातील कोळकी येथे माने परिवाराच्या वतीने परित्राण पाठ व धम्मदीक्षा समारंभ रविवार, १८ जानेवारी रोजी अत्यंत श्रद्धा, शांतता व धम्ममय वातावरणात संपन्न झाला. या पवित्र कार्यक्रमाला परिसरातील बौद्ध अनुयायी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११ वाजता धम्मदीक्षेने झाली. भारतीय बौद्ध महासभा, शाखा फलटण तालुक्याचे कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते व सरचिटणीस बाबासाहेब जगताप यांनी माने परिवाराच्या वतीने भंते काश्यप यांच्याकडे त्रिसरण व पंचशील प्रदान करण्याची याचना केली.
भंते काश्यप यांनी माने परिवारासह उपस्थित सर्व अनुयायांना त्रिसरण व पंचशील प्रदान केले. यावेळी समता सैनिक दलाच्या वतीने संरक्षण व्यवस्था ठेवण्यात आली होती. तसेच भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे कोषाध्यक्ष, संस्कार सचिव अमोल काकडे, संघटक अरविंद निकाळजे, विजयकुमार जगताप उपस्थित होते.
यानंतर भारतीय बौद्ध महासभा, फलटण शाखेचे कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते व सरचिटणीस बाबासाहेब जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्धपूजा, भीमस्मरण व भीमस्तुती घेण्यात आली.
भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा (पूर्व) चे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दिलेल्या २२ धम्म प्रतिज्ञा संपूर्ण माने परिवारासह धम्मदीक्षा घेणाऱ्या सर्व अनुयायांना दिल्या. यावेळी ११ उपासक-उपासिकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.
भंते काश्यप यांनी परित्राण पाठाचे मानवी जीवनातील महत्त्व विशद करत धम्माच्या आचरणातून मानसिक शांती, संरक्षण व सकारात्मक ऊर्जा कशी मिळते, याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर माने परिवाराच्या निवासस्थानी परित्राण पाठाचे पठण करून परिवारासाठी मंगल आशीर्वाद दिले.
किशोर रामचंद्र माने, पोर्णिमा किशोर माने, मंथन किशोर माने, देवांग किशोर माने, सुहास रामचंद्र माने, रजनी सुहास माने, रिहान सुहास माने, सुहान सुहास माने व बेबीनंदा रामचंद्र माने यांनी परित्राण पाठाच्या माध्यमातून आशीर्वाद स्वीकारले.
कार्यक्रमानंतर माने परिवाराच्या वतीने शाहू–फुले–आंबेडकर सभागृह, कोळकी येथे भोजनाची व्यवस्था करण्यात आली. धम्म, समता, करुणा व बंधुत्वाचा संदेश देणारा हा कार्यक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
