इन्फ्लुएंझाची लक्षणे दिसल्यास लगेचच उपचार करून घ्यावेत – सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत


दैनिक स्थैर्य । दि. १६ मार्च २०२३ । मुंबई । राज्यात इन्फ्लुएंझा आजाराबाबत सतर्क राहण्याच्या सूचना सर्व जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांना देण्यात आल्या असून राज्यस्तरावरून नियमितपणे सनियंत्रण करण्यात येत आहे. नागरिकांनी लक्षणे दिसल्यास दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावेत, दिरंगाई करु नये, असे आवाहन आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केले.

एच३एन२ फ्ल्यू सदृश्य साथरोगाबाबत आरोग्य मंत्री श्री. सावंत यांनी आज विधानसभेत निवेदन केले.

मंत्री सावंत म्हणाले, एच३एन२ फ्ल्यू सदृश्य साथरोगाचे रुग्ण रोज वाढत आहेत. अहमदनगर आणि नागपूरमध्ये एका व्यक्तीचा एच३एन२ ने मृत्यू झाला आहे. इन्फ्लुएंझा ए आजार विषाणूमुळे होणारा आजार आहे. इन्फ्लुएंझा ए चे वेगवेगळे उपप्रकार आहेत. उदा. एच१एन१ एच३एन२ इ. या आजाराची सर्वसाधारण लक्षणे ताप, खोकला घशात खवखव, धाप लागणे, न्यूमोनिया अशी लक्षणे आढळून येतात. इन्फ्लुएंझा ए बाबत रुग्ण सर्वेक्षण मुख्यतः लक्षणाधारीत आहे. याबाबत सर्व आरोग्य केंद्रात रुग्णाची तपासणी करण्यात येते व मार्गदर्शक सूचना नुसार उपचार करण्यात येतात. १३ मार्च २०२३ अखेर एच१एन१ बाधित ३०३ रुग्ण आणि एच३एन२ बाधित ५८ रुग्ण आढळून आले आहेत.

राज्यात इन्फ्लुएंझा आजार मुख्यत्वेकरुन पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, औरंगाबाद, सांगली, कोल्हापूर  जिल्ह्यातील शहरी भागात दिसून येत आहेत. या आजाराची लक्षणे तसेच उपचार पद्धती याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. राज्यातील रुग्णालयात संशयीत रुग्णांवर आवश्यकतेनुसार विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत असून आरोग्य संस्थेत आजारावरील उपचारासाठी लागणारी औषधे उपलब्ध असल्याचे श्री.सावंत यांनी यावेळी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!