
स्थैर्य, सातारा, दि. ७ जुलै : आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ८ जुलै रोजी आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. यंदा या पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्यात लोणंद, तरडगाव, फलटण आणि बरड असे एकूण ४ मुक्काम असणार आहेत. वारकरी आणि भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.
पालखी सोहळ्याचा सातारा जिल्ह्यातील कार्यक्रम:
-
१५ जुलै (लोणंद मुक्काम): नीरा नदीत माऊलींच्या पादुकांना पवित्र स्नान घातल्यानंतर पालखी सातारा जिल्ह्यात प्रवेश करेल आणि पहिला मुक्काम लोणंद येथे करेल.
-
१६ जुलै (तरडगाव मुक्काम): लोणंदहून प्रस्थान केल्यानंतर ‘चांदोबाचा लिंब’ येथे माऊलींच्या पालखीचे पहिले उभे रिंगण होईल. त्यानंतर पालखीचा मुक्काम तरडगाव येथे असेल.
-
१७ जुलै (फलटण मुक्काम): पालखी सोहळ्याचा मुक्काम फलटण येथे असेल.
-
१८ जुलै (बरड मुक्काम): पालखीचा सातारा जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम बरड येथे होईल.
प्रशासनाचे नियोजन आणि पावसाचा व्यत्यय:
जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) याशनी नागराजन आणि जिल्हा पोलीस प्रमुख निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी मार्गावर जोरदार तयारी सुरू आहे. लोणंद नगरपंचायत, तरडगाव ग्रामपंचायत, फलटण नगरपालिका आणि बरड ग्रामपंचायत यांच्याकडून नियोजनबद्ध काम केले जात आहे. मात्र, गेल्या ३-४ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे या तयारीच्या कामात थोडा व्यत्यय येत आहे.