![](https://i0.wp.com/sthairya.com/wp-content/uploads/2020/10/hathras_1602469201.gif?resize=730%2C470&ssl=1)
स्थैर्य, हाथरस, दि.११: हाथरस तरुणी हत्याकांडाच्या प्रकरणात सीबीआयने अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींच्या विरोधात हत्या, सामूहिक बलात्काराच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत या प्रकरणाची चौकशी यूपी पोलिसांची एसआयटी करत होती. दरम्यान, पीडितेच्या कुटुंबाला सोमवारी कडक सुरक्षेत अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात जबाब नोंदवण्यासाठी नेण्यात येणार आहे.
सूत्रांनी सांगितले की, पीडितेच्या कुटुंबाने जिवाला धोका असल्याचे सांगत रविवारी रात्री लखनऊला जायला नकार दिला. यामुळे सोमवारी सकाळी ५ वाजता हाथरसहून लखनऊला जाण्याचे नक्की झाले. काही वृत्तांत दावा करण्यात आला आहे की, पीडित कुटुंब सोमवारीच मुख्यमंत्री योगींची भेट घेईल, मात्र याची पुष्टी दोन्हीकडून करण्यात आलेली नाही. पीडित कुटुंबातील पाच जण न्यायालयात जवाब देणार असून या सर्वांच्या सुरक्षेसाठी तब्बल ६० जवान तैनात असतील शिवाय ८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असेल.
अलाहाबाद हायकोर्टात जवाब
न्यायालयाने १ ऑक्टोबरला स्वत:हून दखल घेत पीडितेच्या आई-वडिलांचा जबाब नोंदवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सुरक्षा देण्यास सांगितले हेाते. यासाठी एका अधिकाऱ्याची खास नियुक्ती करण्यात आली आहे. कुटुंबाच्या सुरक्षेसाठी घरी ६० सुरक्षा कर्मचारी तैनात असून ८ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. पीडितेचा मोठा व धाकटा भाऊ, बहीण, आई-वडील कोर्टात जवाब देतील.